Saturday, November 26, 2022

अभिनयाचा बॅरिस्टर द्विधाता विक्रम गोखले श्रीधर तिळवे नाईक  

विक्रम गोखले गेले एक उत्तम अभिनेता मराठीतील उथळ कमर्शियलिझममुळे ग्रेट न होताच गेला प्रभावी मुखाभिनय हे केंद्र असलेला एक अभिनेता गेला 

ते हिंदीत आले तेव्हा त्यांची चेहरेपट्टी विश्वजितसारखी असल्याने त्यांच्या सौंदर्याचे फार कौतुक कुणाला न्हवते पण विश्वजितकडे नसलेली एक गोष्ट त्यांच्याकडे होती ती म्हणजे अभिनय ! त्यांची देहयष्टीचं अशी होती कि ते कायम पस्तिशीतले वाटत आणि ह्यामुळे त्यांचे कायम नुकसान झाले वास्तविक त्यांचा समकालीन असलेला मोहनलाल काहीसा असाच होता पण त्याच्यासाठी जसे रोल निर्माण झाले तसे विक्रम गोखले ह्यांच्यासाठी झाले नाहीत ह्याला मराठीचा करंटेपणा जबाबदार होता अपवाद कळत नकळत बॅरिस्टर इस्लामवाद व हिंदुत्ववाद ह्या दोन्ही विचारप्रणाली धर्मकेंद्री असल्याने त्या कधी कधी माणसाला अहंकारी बनवतात सावरकर आणि जिना ह्या दोघांचीही व्यक्तिमत्वे पाहावीत गोखलेंना असा अहंकार होता असा प्रवाद होता आणि त्याच्यामुळेही त्यांच्यासाठी असे काही रोल लिहिण्यात अडथळे झाले त्यांचे व्यक्तिमत्व अप्रोच करायला अवघड वाटे अशावेळी नाना पाटेकरने सार्वजनिक जीवनात येऊन खळखळून हसण्याचे हसवण्याचे प्रसंग आणले तसे त्यांनी केले नाही त्यामुळे कायमच एक सिरीयस प्रौढगंभीर अभिनेता अशी त्यांची इमेज होत गेली वास्तविक त्यांच्याकडे त्यांचा म्हणावा असा हलकेफुलकेपणा होता ते हसले कि मस्त वाटत 

त्यांचे अभिनयाचे स्कूल हे आत्मधर्मी रोमँटिक स्कूल असले तरी ते राजेश खन्नासारखे शिळे होत गेले नाहीत कारण त्यांचे मॅनरिझम तोचतोचपणात स्टायलाइझ्ड झाले नाही मात्र खन्नाची एक गोष्ट त्यांच्याकडे न्हवती ती म्हणजे गानाभिनय ते गाण्यात कधीच उर्जावान वाटले नाहीत त्यांचा बुद्धिमान वाटणारा चेहरा ह्याबाबत साथ देत नसावा मात्र इतर अनेक ठोकळ्यांपेक्षा ते चांगले होते म्हणजे उदा भिंगरीतलं सजणी ग किंवा बाळा गाऊ कशी अंगाईतलं सुपरहिट धुंदीत गाऊ मस्तीत राहू ह्या गाण्यांच्यात ते चांगले होते (धुंदीत गाऊ मध्ये तर ते हँडसम दिसतातच पण तत्कालीन अनेक अभिनेत्यांपेक्षा उत्तम रोमँटिक अभिनय करून गेलेत त्यांच्या ह्या लुकचा फायदा तत्कालीन निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी का उठवला नसेल असाच प्रश्न हे गाणे पाहताना पडतो )

त्यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद मुखाभिनय होता ते ह्याबाबत बाप होते आणि ह्याच्याच जीवावर त्यांनी भल्याभल्यांना टक्कर दिली उदा अग्निपथ मध्ये ते बच्चनच्या तोडीसतोड होते त्यांचा नेत्राभिनय भावदर्शी होता नैराश्य आणि उदासी ह्यांच्यातील फरक प्रकट करणारे जे मोजके अभिनेते होते त्यातील ते एक ! ते अभिनयात कधीही भावबंबाळ झाले नाहीत अगदी भावबंबाळ सीन्समध्येही ते योग्य संयम राखायचे 

एरव्ही संयमी असणारे विक्रम गोखले अचानक भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात असे बेभान का झाले ? कि त्यांचा हा सुप्त स्वभाव होता ?

 सेक्युलर श्रीराम लागू व हिंदुत्ववादी विक्रम गोखले ह्यांचा एक सुप्त संघर्ष सुरवातीपासूनच अस्तित्वात होता पण १९७५ ते २०१० ह्या काळात मीडिया सेक्युलॅरिझमच्या ताब्यात असल्याने सेक्युलर मीडियाने श्रीराम लागूंना अतोनात प्रसिद्धी दिली त्यांचे ईश्वराला रिटायर करा गाजले गाजवले गेले ह्या काळात सेक्युलर मीडियाने विक्रम गोखलेंच्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही बहुदा ह्याची खदखद गोखलेंच्या आत साठली असावी आणि मग त्यांनी कंगना राणावतच्या उथळ बोल्डनेसला अवसानघातकी प्रतिसाद दिला हा प्रतिसाद त्यांनी द्यायला नको होता त्यांच्या ह्या एका कृतीने त्यांची इमेज बिघडली 

दुर्देवाची गोष्ट अशी कि त्यांचा हिंदुत्ववादी स्टान्स नको तितका प्रमोट करून त्यांच्या अभिनयाची गुणवत्ता झाकोळवली गेली हे व्हायला नको होते पण सध्याचा काळ आयडियालॉजिकल डिक्टेटरशिपचा आहे आणि ह्याची सुरवात हिंदुत्ववाद्यांनी केली शत्रूशी लढता लढता आपण शत्रूसारखे बनतो ह्या नित्शेयीन न्यायाने सेक्युलॅरिस्ट पण आयडियालॉजिकल डिक्टेटरशिपकडे सरकायला लागलेत ह्यातून हातघाईचा उदय अटळ आहे ह्या हातघाईनेच गोखलेंच्या मृत्यूआधीच त्यांच्या मृत्यूची बातमी दिली गेली सोर्सेस रिलायबल आहेत कि नाही हे चेक करण्याची जबाबदारी कोणाची ? कधीकधी सोर्सेस धोखा देतात म्हणून क्षमा करून ही चर्चा थांबवणे आता आवश्यक वाटते 

गोखलेंच्या निधनामुळे जे काही झाले त्यातून एक प्रश्न मात्र निश्चित निर्माण झाला आहे कलावंताची कला व कलावंताची जीवनदृष्टी ह्यांचा संबंध कसा तपासावा ? कशाला किती महत्व द्यावं ? म्हणजे मला देशीवाद आवडत नाही पण नेमाडे लेखक म्हणून आवडतात किंवा मार्क्सवाद विवादास्पद वाटतो पण नारायण सुर्वे ,बर्टोल्ट ब्रेख्त , गॉर्की , मायकोवस्की माझे आवडते लेखक आहेत किंवा इस्लामवाद मला कधीच पटला नाही पण इकबाल मला आवडतो माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि अव्वल दर्जाचा कलावंत कला निर्माण करताना नेहमीच त्याच्या विचारप्रणालीला ओलांडून थेट आयुष्यात उतरतो आणि त्या आयुष्याला अभिव्यक्ती देतो साहजिकच ते वाचताना आपणाला भिडते ते त्याने व्यक्त केलेले आयुष्य ! त्याने व्यक्त केलेली माणसे ! अभिनयासंदर्भात व्यक्तिरेखा ! द्विधाता किंवा बॅरिस्टर सारख्या कलाकृतीत विक्रम गोखले अभिनयाचा अव्वल दर्जा ठेवून व्यक्तिरेखा उभारतात म्हणून आपण त्यांना चांगले अभिनेते मानतो . 

गोखले गेले एक उत्तम अभिनेता गेला , त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, September 20, 2022

 तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकलाय ना किमान आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय ना ? मग मराठी चित्रपटांना ऑडियन्स नाही म्हणून बोंब काय मारता ? केवळ तुमचे पिक्चर्स चालावेत म्हणून अंगवळणी पडलेल्या इंग्लिशचा इंग्लिश हिंदी चित्रपट पाहण्याच्या सवयीचा त्यांनी त्याग करावा का ?

श्रीधर तिळवे नाईक 

मी अडाणी मनुष्य असल्याने पाच  प्रकाराने मराठी चित्रपट पाहतो 

१ प्रायोगिक(हे मराठीत जवळजवळ नाहीतच ) वा समांतर मराठी चित्रपट म्हणजे न्यूड जैत रे जैत सिंहासन फॅन्ड्री 
२ यशस्वी व्यावसायिक चित्रपट ज्यांनी उत्तम गल्ला जमवलाय म्हणजे सैराट , टाईमपास १ , पिंजरा , सुशीला , झुंज 
३ यशस्वी धंदेवाईक चित्रपट दादा कोंडके , महेश कोठारे , सचिन , संजय जाधव ह्या सारख्या दिग्दर्शकांचे किंवा काहीवेळा टेक्निकल रिझनसाठी उदा  भानू अथैयाच्य कॉस्च्युम्सठी आर्ट डिरेक्शनसाठी उदा नितीन चंद्रकांत देसाई  अपवादात्मकवेळा अभिनयासाठी उदा लक्ष्या व अशोकसाठी अशी ही बनवाबनवी किंवा उषा चव्हाणचे काय ग सखू बोला दाजीबा 
४ मला चित्रपटापेक्षा संगीत आणि कोरियोग्राफी जास्त आवडते अत्यंत फालतू गाणीही मी चार पाच वेळा ऐकली आहेत चांगली गाणी असतील तर किमान दहादा पिंजरा , झुंज , सुशीला , सैराट , टाईमपास सारखी मेजवानी असेल तर शेकडोवेळा अलीकडे एखादे गाणेच चांगले असते ते मी खूपदा पाहतो ऐकतो राम कदम , हृदयनाथ मंगेशकर व अजय अतुलचे अनेक चित्रपट केवळ त्यांच्या संगीतासाठी मी सहन केले आहेत 
५ मैत्री ही माझ्यासाठी महत्वाची असल्याने माझ्या मित्रांचे चित्रपट पाहण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो म्हणजे किशोर कदम , अभिराम भडकमकर , मनोज जोशी ,राकेश सारंग  ह्यासारख्या माझ्या मित्रांचे चित्रपट मी प्रथम ते मित्र आहेत म्हणून पाहतो 

मी मराठी लोकांना , संस्कृतीला , माध्यमांना कचकचीत शिव्या घालतो आणि मराठी चित्रपट आणि चॅनेल्स पाहतो आपल्या लोकांना शिव्या घालायच्या नाही तर कुणाला घालायच्या असा माझा कोल्हापुरी बाणा आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

Friday, July 8, 2022

 कमलासन (कमल हासन )ह्याचा विक्रम श्रीधर तिळवे नाईक 

भारतीय परंपरेत कमळ हे कुंडलिनीचं व सृजनशीलतेचं प्रतीक मानलं जातं आणि जणू नाव सार्थ करण्यासाठी कमलासन (कमळाचे आसन )  सृजनशीलतेचे नवे नवे आयाम दाखवत असतो तो मूळचा लेखक हे आता सांगितले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही साहजिकच लेखक दिग्दर्शक म्हणूनच त्याला करिअर करायचे होते 

के बालचंदर ह्यांच्याकडे आलेल्या एकाच बाईकवरून फिरणाऱ्या दोन तरुणांना गुरु म्हणून त्यांनी पूर्ण वेगळे कानमंत्र दिले त्यातील एकाला सांगितली मेथड ऍक्टिंग तर दुसऱ्याला स्टाइलाईझ्ड पहिला कमलासन झाला दुसरा रजनीकांत १९७० साली मानवन मध्ये के बालचंदर ह्यांनीच त्याला लॉन्च केले दोघेही आपल्या गुरूशी इतके एकनिष्ठ कि गुरूच्या काही कार्यक्रमात एक डाव्या बाजूला तर दुसरा उजव्या बाजूला बसायचे. 

स्टॅनिस्लॅव्हस्कीची भारतीय चित्रपटातील परंपरा गजानन जहागीरदार (एफटीआयचे पहिले संचालक तेच होते )ह्यांनी सुरु केली आणि अशोक कुमारने ती स्वीकारून पुढे डेव्हलप करून सादर करायला सुरवात केली पुढे दिलीपकुमारने ती प्रस्थापित केली ह्या स्कूलमधील सर्वश्रेष्ठ अभिनेता कमलासन होय माझा स्वतःचा तो सर्वात लाडका अभिनेता आहे 

माझ्यादृष्टीने नम्बर एक कमलासन त्याच्याखालोखाल नासिरुद्दीन शहा ! सदमातला पॅशनेट प्रेमी ,पुष्पकमधला कॉमिक ,नायकन मधला दादा ,अप्पू राजातला बुटका , विक्रममधला ऍक्शन हिरो ,चाची ४२० मधली चाची, ,दशावथारमातले दहा रोल (शिवाजी गणेशनने एकाच फिल्म्समध्ये बहू (दहा) रोल्सची परंपरा सुरु केली होती मग दिलीपकुमार संजीवकुमार गोविंदा ) हे राममधला साकेथ राम आणि अनेक नृत्यप्रधानमधला नर्तक ! कमर्शियल आणि क्लासिकल दोनी शैलीत निपुण कमलासनच ! नासिरुद्दिनचे नृत्य व गाण्यातले लिपसिंकिंग म्हणजे बोंबच आहे . तो ह्या दोन गोष्टीत कमालासनपेक्षा कमी पडतो 

जो मुलगा वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रपती नॅशनल अवॉर्ड मिळवतो तो पुढे काय करणार ते स्पष्टच होते मला स्वतःला अष्टपैलू लोकांच्याविषयी नेहमीच आदर वाटत आलाय फिल्म इंडस्ट्रीत व्ही शांताराम , गुरुदत्त , किशोरकुमार , कमलासन व धनुष अशी एक अष्टपैलूंची परंपराच आहे त्यांच्यातही कमलासन हा कदाचित सर्वश्रेष्ठ असावा कारण इतरांच्यापेक्षा मेकप हा त्याच्याकडे एक एक्स्ट्रा असेट आहे किशोरकुमार नृत्यात उरलेल्या चौघांच्या तुलनेत काहीच नाही पण गायक म्हणून अव्वल ! गुरुदत्त हा स्वतः कोरिओग्राफरही पण त्याने आपल्या नृत्यकौशल्याला फारसा वावच दिला नाही दिग्दर्शक म्हणून ह्या चौघांच्यात तो व व्ही शांताराम अव्वल ! कमलासन अभिनयात ह्या सगळ्यांचा बाप ! ज्याला कम्प्लिट ऍक्टर म्हणावा असा एकमेवाद्वितीय ! 

साहजिकच १९८० पासून मी त्याचा शक्यतो एकही चित्रपट चुकवत नाही कोल्हापूरात सर्वच त्याचे सर्वच चित्रपट रिलीज होत नसत म्हणून मी केवळ त्याच्यासाठी बेळगाव वारी करायचो पुढे एक दुजे के लिये (हा मी २५ वेळा बघितला होता )रिलीज झाल्यावर कोल्हापुरातही त्याच्या अनेक फिल्म्स रिलीज व्हायला लागल्या त्याने कोल्हापुरात नृत्यशिक्षण घेतल्याने त्याच्याविषयी त्या वयात एक वेगळे आकर्षण होते 

अश्या ह्या कलावंताला पुढे अभिनयाच्या आर्टिफिशियल विविधतेचे जेव्हा व्यसन लागले तेव्हा आमच्या दृष्टीने तो एक त्रासदायक प्रकार झाला कथा पटकथा फाफललेली व फक्त अभिनय हे समीकरण फारसे भुरळ घालत नाही 

परिणामी ओव्हरबजेट गेलेल्या फिल्म्स आणि झालेली कर्जे ह्याने कमलासन घायाळ झाला आणि त्याच्या राजकमलचा एक तरी प्रोजेक्ट सुपरहिट व्हावा म्हणून त्याचे चाहते पाण्यात देव घालून बसले ह्याच काळात गौतमीबरोबरचा ब्रेकप , सिम्रनबरोबर अफेयरच्या अफवा , सारिकाबरोबरचा घटस्फोट , अक्षराचा बौद्ध धर्म स्वीकार , कधी न्हवे ते सामाजिक रेट्यामुळे आपण ब्राम्हण आहोत अशी त्याने दिलेली कबुली , द्रविड आयडेंटिटीचा वापर करावयास त्याने दिलेला नकार आणि सेक्युलॅरिझमचे त्याने केलेले कट्टर समर्थन ह्यामुळे तो अधिकच आतबट्ट्यात गेला 

पण २०२१ पासून माहोल बदलत चाललाय आणि त्यांच्याविषयीचा कडवटपणा कमी होत चाललाय साउथचे अनेक चित्रपट नॉर्थवाल्यांनी स्वीकारल्याने दक्षिण उत्तर वाद फिल्मच्या पातळीवर मवाळ झाला आणि कमलासन अगदीच काही चुकीचं बोलत नाही असं सर्वांना वाटायला लागलं साहजिकच लोकेश कनगराज (हिंदीत कनकराज ) जेव्हा विक्रम हा विक्रमचा दुसरा भाग (सिक्वेल म्हणता येईल का ? मला शंका आहे )घेऊन आला तेव्हा वातावरण बरंच निवळलं होतं आणि फिल्मने ह्यावर्षी तमिळमध्ये सर्वाधिक गल्ला गोळा करण्याचा विक्रम केला 

लोकेशने कमलची  अभिनयातील आर्टिफिशियल विविधतेची भूक नैसर्गिक करून एकीकडे विविधता दिली पण ही विविधता व्यक्तिरेखेवर मात करणार नाही ह्याची काळजी घेतली कमलासनच्या चित्रपटात अनेकदा फक्त तोच दिसायचा इथे मात्र विजय सेथुपती व फाहद फासील ह्यांना परफेक्ट वाव दिला परिणामी कथा वधारली अलीकडे लेखक असल्याने कमलासन नको ती घुसखोरी करायचा लोकेशने त्याला लिखाणापासून दूर ठेवून कमर्शियल प्लॉटचं कमलासन अलीकडं जे भजं करायचा ते त्याला करू दिलं नाही परिणामी एक परफेक्ट कमर्शियल फिल्म दिली जिने ५०० करोडला टच केलं आहे 

मला स्वतःला सर्वाधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे कि कमलासनवर असलेलं सर्व कर्ज आता फिटेल त्याच्यासारख्या कलावंतांवर ही वेळ यायलाच नको होती पण आली साऊथच्या सर्वच कलावंतांनी त्याला सहकार्य दिलं अन्यथा मास्टरमध्ये केलेल्या व्हिलनला बॉडी लँग्वेजच्या दृष्टीने पुन्हा रिपीट करण्यात विजय सेथुपतीला काय इंटरेस्ट असणार ? आणि सूर्या चक्क कॅमिओ व्हिलन ! पण कमलासन बरोबर काम करण्याची संधी व त्यांची कर्जापासून मुक्तता व्हावी म्हणून असलेली कळकळ  ह्यांनी हे सहकार्य निर्माण केलं 

कमलासनचे राजकीय विचार मला अनेकदा पटले नाहीत पण कलावंताचे राजकीय विचार व त्याची कला ह्या दोन गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजेत असं मी मानतो सामाजिक बाबतीत तो समाज मागे न्हेत नाही ना एव्हढं मात्र मी अवश्य पाहतो कमलासन कायमच सामाजिक पातळीवर पुढारलेला होता व आताही आहे त्यामुळे तो हिट होणं गरजेचं होतं तो झाला ह्याबद्दल त्याचे व लोकेशचे मनापासून आभार ! विजय सेथुपतीने आता व्हिलनची काम करणं थांबवावं जेवढे व्हिलन त्याने केले ते खूप झाले आम्ही आता काही वेगळं पहायला उत्सुक आहोत जे फक्त तोच देऊ शकतो . 


श्रीधर तिळवे नाईक