Saturday, December 12, 2020

 आर्या बॅनर्जी गेली श्रीधर तिळवे नाईक होतं 



भारतात शास्त्रीय संगीतात एक वाद नेहमीच चालू असतो निखिल बॅनर्जी श्रेष्ठ कि रविशंकर श्रेष्ठ ? वास्तविक दोघेही मल्हार घराण्याचे आणि दोघांनीही सतार जगप्रसिद्ध केली पण रवीशंकर जगभर जसा प्रचार करत हिंडले तसे निखिल बॅनर्जी हिंडले नाहीत रविशंकर प्रायोगिक होते तर निखिल बॅनर्जी समांतर दोघांनीही परंपरेचे अनुकरण न करता तिला ताजगी दिली उस्ताद अल्लाउद्दीन खान ह्यांचे हे दोघेही शिष्य पण निखिल बॅनर्जी परंपरेकडे जास्त कललेले ! दोघेही मेस्ट्रो म्हणजे दादा ! तिसरे अर्थातच विलायत खान !

आर्या बॅनर्जींशी माझी पहिली मिटिंग झाली तेव्हा मला माहित न्हवतं कि ती निखिल बॅनर्जींची कन्या आहे तिने संगीतात मास्टर डिग्री प्राप्त केली होती म्हणून मी तिला गंमतीत छेडलं होतं आणि निखिल बॅनर्जी विरुद्ध रविशंकर असा वाद सुरु झाला मी तिला सांगितलं कि माझे वडील निखिल बॅनर्जींचे फॅन आहेत ते तिला आवडलं मी निखिल बॅनर्जींचं योगदान नाकारत न्हवतो पण रविशंकर हे अधिक प्रायोगिक होते असं माझं मत होतं आणि तिला ते मान्य न्हवतं निघताना तिनं सांगितलं कि मी निखिल बॅनर्जींची कन्या आहे साहजिकच मग पुन्हा भेटू असा वादा करून आम्ही वेगळे झालो 

दुसऱ्या मीटिंगमध्ये मात्र सत्यजित रे पासून गोडार्ड पर्यंत सर्वांच्यावर चर्चा सुरु झाली मी ऋत्विज घटकांचा फॅन आणि तीही ! मिटिंग संपल्यावर तिने पिण्याची ऑफर दिली मी दारू पीत नाही म्हणून सांगितले तिला तो धक्का होता सिरियसली ? तिने विचारले मी म्हणालो हो मी दारू सिगरेट वैग्रे काहीही भानगडी करत नाही का हा पुढचा प्रश्न आला मी म्हणालो मोक्ष ! ती फक्त इंटरेस्टिंग म्हणाली आणि निघून गेली 

मग मिटींगा सुरु झाल्या तिने जगातले उत्तम चित्रपट पाहिले होते ती उत्कृष्ट कुक होती वेगवेगळ्या डिशेस बनवण्याची शौकीन ! तिचे जगाचा आस्वाद घेण्याचे स्वतःचे काही फ़ंडे होते पण कुठेही सौंदर्यतोल ढळायचे नाहीत एक प्रकारचा बंगाली अभिजातपणा तिच्या बॉडीलँग्वेजमध्ये वावरत राहायचा  आपण पुरेसे सुंदर नाही आहोत असा तिला कॉम्प्लेक्स असावा पण ती तो बोलून दाखवायचा नाही मी मात्र तिला कायमच सुन्दर आणि स्मार्ट म्हणायचो तिच्या डोळ्यात एक आर्तता असायची आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणाऱ्या मुसाफिराची मुंबई शहरात ती एकटी होती आणि तिचे फक्त चार पाचच मित्र असावेत 

माझ्या ऍरोगन्सला सुरवातीला नाके मुरडणारी ती तो जन्मजात आहे हे लक्ष्यात येताच सरावली . गोव्याबद्दल तिला उत्सुकता होती आणि मी गोवन नाही ह्याची तिला माझ्या कोल्हापुरी भाषेवरून खात्रीच पटली होती तिचे मूळ नाव देवदत्ता होते पण ते लांब वाटल्याने तिने आर्या हे नाव घेतले 

आर्या बॅनर्जी गेली . अनपेक्षित आणि धक्कादायक ! पोलीस योग्य ते सत्य शोधतीलच पण ती गेली ह्या सत्याचं करायचं काय ?

 तिचा पहिला चित्रपट लव्ह सेक्स अँड धोखा हिट झाला आणि ती लाइमलाईटमध्ये आली ह्या चित्रपटातील तिचा अभिनय अफलातून होता कारण तिने सादर केलेली व्यक्तिरेखा तिच्या मूळ व्यक्तिरेखेशी अजिबात जुळणारी न्हवती तिने त्या रोलसाठी कायापालट केला होता प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत सुशील आणि एटीकेट असणारी आर्या  फिल्ममधे कसलेही एटीकेट नसलेल्या शिवराळ आणि फ्रष्टेशन डुबलेल्या गायिकेच्या व्यक्तिरेखेच्या बोल्ड अवतारात होती ह्यांनंतर तिची करिअरची गाडी वेगाने धावेल असं सर्वांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात असं घडलं नाही बॉलिवूड तिला बोल्ड अवतारात टाईपकास्ट करू पहात होतं आणि आर्याला टाईपकास्ट व्हायचं न्हवतं ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला ऑफर लिमिटेड झाल्या 

एके दिवशी तिचा फोन आला म्हणाली ,"मला शकिलाविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे " मला सुरवातीला बॉलिवूडची शकीला वाटली मग कळलं कि तिला साऊथच्या सेक्स सायरनविषयी जाणून घ्यायचं आहे मी मला माहीत असलेल्या शकीलाच्या गोष्टींविषयी बोललो मग कळलं कि तिला डर्टी पिक्चर ऑफर झालाय मला हा रोल तिने करावा हे पटलं नाही एडिटिंग मध्ये काही शिल्लक राहणार नाही अशी मला शक्यता वाटत होती पण तिचा प्रश्न सडेतोड होता एकता कपूर ही माझी मेंटॉर आहे मी तिला नाही कशी म्हणू शकते ? शिवाय विद्या बालन हे आकर्षण होते तिने शकिलाला योग्य तो न्याय दिला होता पण रोल मर्यादित लांबीचा झाला होता हाही चित्रपट सुपरहिट झाला 

दोन चित्रपट हिट दिल्यावरही आर्याला ऑफर येईनात हे धक्कादायक होते तिच्याबरोबर ह्या लव्ह सेक्स और धोखा ह्या चित्रपटात काम केलेली नुसरत भरुचा ही कुठल्याकुठे निघून गेली पण आर्याच्या वाट्याला असे काही आले नाही बॉलिवूड यश बघते म्हणतात पण आर्याच्या दोन्ही फिल्म्स हिट होऊनही तिला चित्रपट मिळेनात तेव्हा नेमकं काय केलं कि बॉलिवूड ऑफर देईल अशा चर्चा सुरु झाल्या ह्यातून एक हिरोईन ओरिएंटेड फिल्मचा मुद्दा पुढे आला 

दरम्यान तिने गोव्यावर आधारित एक फिल्म सावधान इंडियासाठी स्वीकारली आणि तुझ्या प्रदेशात शूटिंग करतीये म्हणून फोन केले माझ्यासाठी हेही धक्कादायक होते . बॉलिवूडमध्ये तुम्ही सावधान इंडिया क्राईम पेट्रोलमधून फिल्ममधे जाणे हे मानाचे व फिल्ममधून सावधान इंडिया क्राईम पेट्रोलमध्ये येणे हे बेकारीचे लक्षण मानले जाते पण हे समजून घ्यायची तिची तयारीच न्हवती दिग्दर्शक मोठा आहे म्हणून तिने हे काम केले आणि मला स्लॉट कळवून मतही विचारले हेही काम तिने मनापासून केले होते 

मग एक बंगाली फिल्म आल्याची व त्यासाठी परदेशात जाणार असल्याची माहिती तिने दिली . फिल्म हे तिचे माध्यम असल्याने मी आनंदलो . 

दरम्यान मी तिच्या टॅलेंटला न्याय देईल अशी एक हिरॉईन ओरिएंटेड फिल्म लिहायला घेतली आणि पूर्ण केली तिला ती अतिशय आवडली आणि आम्ही काही काम करायला सुरवात करणार तोच मला अपघात झाला मग माझ्या बहिणीचा मृत्यू मग भावाचा मृत्यू अशी एक मालिका सुरु झाली ह्याचवेळी तिच्याही जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून ती कलकत्याला निघून गेली मग दुसऱ्या दिवशी फोन आला म्हणाली ,"तू कलकत्याला ये मला इथे विश्वासार्ह माणूस हवं आहे आणि तुझ्याखेरीज मला कुणी दिसत नाही " मी स्वतः माझ्या अपघात  मालिकेत अडकलेलो आणि मोक्षाच्या वाटेवर उमलत चाललेलो ! माझ्या कामवासनेचा अस्त मला साधलेला ! ह्या दोन्ही कारणांमुळे मी नाही म्हणालो तिला मला गृहीत धरल्याने माझे नाही म्हणणे हे तिला अनपेक्षित होतं तिने त्यानंतर माझ्याशी संबंध तोडले ते कायमचेच !मी फोन केले तिने उचलले नाहीत मग मीही थांबलो 

आणि आज चार वर्षांनी थेट बातमी आली . कलकत्याच्या तिच्या घरात तिची डेड बॉडी सापडली . दारू पिऊन लिव्हर खराब झालेले आणि तब्बल दोन लिटर दारू पोटात ! नशेत कार्डियाक अटॅक आला पण तिला तो कळला नाही ! खरेतर तिचा जबरदस्त कंट्रोल होता हा कंट्रोल सुटला कधी ?

ती एकांतप्रिय होती आपण भलं आपलं आयुष्य भलं असा तिचा स्वभाव होता मात्र एखादी व्यक्तिरेखा सादर करायची म्हंटली कि तिच्या अंगात भूत संचारायचे सगळे तपशील गोळा करून त्या व्यक्तिरेखेची  बॉडी लँग्वेज तयार करून ती त्यात स्वतःला ढाळायची त्या जीवावरच तिने डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालनला तोडीस तोड अभिनय केला होता दुर्देवाने बॉलीवूडने तिच्या अभिनयप्रतिभेला न्याय दिला नाही हे शल्य बोचत राहिल्याने तिचा कंट्रोल सुटला ?

मी कलकत्याला गेलो असतो तर हे टळले असते ? तिचे वडील संगीताला अध्यात्मिक साधना समजायचे हा वारसा तिच्याकडे का सरकला नाही ? मी तिला मेडिटेशनचे काही धडे दिले होते पण मुळातच तिचा स्वभाव न्हवता . तिच्या आत असलेल्या अस्तित्वाच्या अध्यात्मिक पोकळीने तिला गिळले ?

तिच्या वडिलांच्याप्रमाणे तिलाही संगीत जीव कि प्राण होते मी न ऐकलेल्या अनेक चिजा तिने मला सांगितल्या काहींच्या सीडीज आणल्या काहींच्या बनवून दिल्या तिचा आवाज सर्वस्वी तिचा होता आणि ती अफलातून गायची ती उत्तम फिल्मी गायिका झाली असती गीतादत्त तिला आवडायची वक्तने किया क्या हसी सितम हे आम्हा दोघांचेही फेव्हरेट ! तिने ते माझ्यापुढे दोनवेळा तरी गायिले असेल . गीतादत्तची काळीज चिरत जाणारी तासीर आणि आर्तता तिच्याकडेही होती 

आपल्या भावना फार कमी वेळा ती व्यक्त करायची वडील लहानपणी गेल्याने एक पोरकेपण तिच्या आयुष्याला व्यापून होते वडिलांच्या नावाला आपल्यामुळे धक्का बसू नये ह्यासाठी ती खूप काळजीपूर्वक बोलायची आणि वागायची भिडस्तपणा हा आम्हां दोघांचाही दुर्गुण होता त्यामुळे लोकांच्याकडे काम मागणे व्हायचे नाही आणि बॉलिवूडमध्ये तुम्ही मागितल्याशिवाय कोणी काम देत नाही तिचा भिडस्तपणा तिला नडला . 

माझ्या लेखी ती एक उत्कृष्ट मैत्रीण होती . हळव्या बंगाली संवेदनशीलतेने भरलेली आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन बाळगणारी व कलेतील अभिजात पर्यावरणाचे भान बाळगणारी बुद्धिमती ! आम्ही आमनेसामने भेटलो कि सगळं विसरून पुन्हा मित्र होऊ अशी मला खात्रीच होती . ती खात्री कायमची नाहीशी झाली . 

तिच्या अव्वल दर्जाच्या प्रतिभेला सॅल्यूट आणि आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

 





No comments:

Post a Comment