Tuesday, August 8, 2023

साधी भव्यता गेली श्रीधर तिळवे नाईक 

 सिद्दीकी गेला , मराठीचा दक्षिणेशी हल्ली काही संबंध उरलेला नाही त्यामुळं तो कोण हाच प्रश्न अनेकांना पडला असेल दाक्षिणात्य व्यावसायिक चित्रपटांना हॉलिवूडच्या कमर्शियल लेव्हलला पोचवण्यात ज्या काही लेखक दिग्दर्शकांचा सिंहाचा वाटा आहे त्यापैकी तो एक ! कन्नडमधून मणिरत्नम तेलगूमधून राजामौली तामीळमधून के बालचंद्र आर मुरुगदास बालू महेंद्रू एस शंकर असे अनेक लोक दाक्षिणात्य सिनेमा उभा करत होते तेव्हा सिद्दीकीने मल्याळममधून कमर्शियल सिनेमा उभा करायला सुरवात केली 

त्याचा मी पाहिलेला पहिला सिनेमा रामजी राव स्पिकिंग होता तो द मॅन रनचा व्हर्जन होता व त्याचाही डिरेक्टर म्हणून पहिला चित्रपट होता प्रियदर्शनने तो हिंदीत हेरा फेरी म्हणून पुन्हा बनवला त्यानंतर त्याचा गाजलेला चित्रपट गॉडफादर होता हा रोमियो ज्युलिएटपासून इंस्पायर्ड होता पण त्याला खास सिद्दीकीचा टच होता तोही हिंदीत हलचल म्हणून आला नंतरचा काबुलीवाला रेकॉर्डब्रेक होता ह्यानंतरचा त्याचा आलेला हिटलर हा मल्याळममधला सर्वाधिक पाहिला गेलेला चित्रपट होता ह्यात त्याने मामुटीकडून त्याने उत्तम कमर्शियल अभिनय करवून घेतला होता 

मराठी लोकांना त्याचा माहित असलेला सर्वात गाजलेला चित्रपट म्हणजे बॉडीगार्ड टर्मिनेटरपासून जो बॉडीगार्डचा नवा आदिबंध उभा राहिला आणि केविन कॉस्टनरच्या बॉडीगार्डपासून ज्याला मान्यता मिळाली तो आदिबंध सिद्दीकीने दाक्षिणात्य इंडियन पद्धतीने उभा करून दाखवला नयनथाराच्या साध्या लुकचा व अभिनयशैलीचा उत्तम वापर त्याने केला हिंदीत करीना कपूरनं स्टायलिश अभिनय करून ह्या व्यक्तिरेखेच्या साधेपणाचं नाटकी भज केलं 

सिद्दीकीची दिग्दर्शन शैली शंकर जयकिशनच्या संगीतासारखी होती सहज पचेल अशी साधी तरीही भव्य पण पौष्टिक ! फ्रेममध्ये दिग्दर्शनाचा कसलाही आव न आणणारी ! प्रत्यक्षात तशी कंपोझिशन्स तुम्ही करायला गेलात कि तुम्हाला हे किती कठीण आहे हे कळतं मुळात सिद्दीकी नट पण असेच घ्यायचा जे व्यक्तिरेखेत शोभतील उदा इंनोसन्टचं त्यानं केलेलं कास्टिंग खुद्द प्रोड्युसरलाही ह्या कास्टिंगमुळं हा चित्रपट चालेलं असं वाटलं न्हवतं  तो कथेच्या प्लॉटमध्ये सर्वत्र खेळकरपणा खेळवत ठेवायचा मात्र हा खेळकरपणा कॉमेडी करत असला तरी ती कधीच ओढूनताणून आणलेली वाटायची नाही एका अर्थाने के बालचंदरचं स्कूल त्यानं पुढं चालवलं 

त्याला माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 



Saturday, November 26, 2022

अभिनयाचा बॅरिस्टर द्विधाता विक्रम गोखले श्रीधर तिळवे नाईक  

विक्रम गोखले गेले एक उत्तम अभिनेता मराठीतील उथळ कमर्शियलिझममुळे ग्रेट न होताच गेला प्रभावी मुखाभिनय हे केंद्र असलेला एक अभिनेता गेला 

ते हिंदीत आले तेव्हा त्यांची चेहरेपट्टी विश्वजितसारखी असल्याने त्यांच्या सौंदर्याचे फार कौतुक कुणाला न्हवते पण विश्वजितकडे नसलेली एक गोष्ट त्यांच्याकडे होती ती म्हणजे अभिनय ! त्यांची देहयष्टीचं अशी होती कि ते कायम पस्तिशीतले वाटत आणि ह्यामुळे त्यांचे कायम नुकसान झाले वास्तविक त्यांचा समकालीन असलेला मोहनलाल काहीसा असाच होता पण त्याच्यासाठी जसे रोल निर्माण झाले तसे विक्रम गोखले ह्यांच्यासाठी झाले नाहीत ह्याला मराठीचा करंटेपणा जबाबदार होता अपवाद कळत नकळत बॅरिस्टर इस्लामवाद व हिंदुत्ववाद ह्या दोन्ही विचारप्रणाली धर्मकेंद्री असल्याने त्या कधी कधी माणसाला अहंकारी बनवतात सावरकर आणि जिना ह्या दोघांचीही व्यक्तिमत्वे पाहावीत गोखलेंना असा अहंकार होता असा प्रवाद होता आणि त्याच्यामुळेही त्यांच्यासाठी असे काही रोल लिहिण्यात अडथळे झाले त्यांचे व्यक्तिमत्व अप्रोच करायला अवघड वाटे अशावेळी नाना पाटेकरने सार्वजनिक जीवनात येऊन खळखळून हसण्याचे हसवण्याचे प्रसंग आणले तसे त्यांनी केले नाही त्यामुळे कायमच एक सिरीयस प्रौढगंभीर अभिनेता अशी त्यांची इमेज होत गेली वास्तविक त्यांच्याकडे त्यांचा म्हणावा असा हलकेफुलकेपणा होता ते हसले कि मस्त वाटत 

त्यांचे अभिनयाचे स्कूल हे आत्मधर्मी रोमँटिक स्कूल असले तरी ते राजेश खन्नासारखे शिळे होत गेले नाहीत कारण त्यांचे मॅनरिझम तोचतोचपणात स्टायलाइझ्ड झाले नाही मात्र खन्नाची एक गोष्ट त्यांच्याकडे न्हवती ती म्हणजे गानाभिनय ते गाण्यात कधीच उर्जावान वाटले नाहीत त्यांचा बुद्धिमान वाटणारा चेहरा ह्याबाबत साथ देत नसावा मात्र इतर अनेक ठोकळ्यांपेक्षा ते चांगले होते म्हणजे उदा भिंगरीतलं सजणी ग किंवा बाळा गाऊ कशी अंगाईतलं सुपरहिट धुंदीत गाऊ मस्तीत राहू ह्या गाण्यांच्यात ते चांगले होते (धुंदीत गाऊ मध्ये तर ते हँडसम दिसतातच पण तत्कालीन अनेक अभिनेत्यांपेक्षा उत्तम रोमँटिक अभिनय करून गेलेत त्यांच्या ह्या लुकचा फायदा तत्कालीन निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी का उठवला नसेल असाच प्रश्न हे गाणे पाहताना पडतो )

त्यांच्या अभिनयाची सर्वात मोठी ताकद मुखाभिनय होता ते ह्याबाबत बाप होते आणि ह्याच्याच जीवावर त्यांनी भल्याभल्यांना टक्कर दिली उदा अग्निपथ मध्ये ते बच्चनच्या तोडीसतोड होते त्यांचा नेत्राभिनय भावदर्शी होता नैराश्य आणि उदासी ह्यांच्यातील फरक प्रकट करणारे जे मोजके अभिनेते होते त्यातील ते एक ! ते अभिनयात कधीही भावबंबाळ झाले नाहीत अगदी भावबंबाळ सीन्समध्येही ते योग्य संयम राखायचे 

एरव्ही संयमी असणारे विक्रम गोखले अचानक भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात असे बेभान का झाले ? कि त्यांचा हा सुप्त स्वभाव होता ?

 सेक्युलर श्रीराम लागू व हिंदुत्ववादी विक्रम गोखले ह्यांचा एक सुप्त संघर्ष सुरवातीपासूनच अस्तित्वात होता पण १९७५ ते २०१० ह्या काळात मीडिया सेक्युलॅरिझमच्या ताब्यात असल्याने सेक्युलर मीडियाने श्रीराम लागूंना अतोनात प्रसिद्धी दिली त्यांचे ईश्वराला रिटायर करा गाजले गाजवले गेले ह्या काळात सेक्युलर मीडियाने विक्रम गोखलेंच्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही बहुदा ह्याची खदखद गोखलेंच्या आत साठली असावी आणि मग त्यांनी कंगना राणावतच्या उथळ बोल्डनेसला अवसानघातकी प्रतिसाद दिला हा प्रतिसाद त्यांनी द्यायला नको होता त्यांच्या ह्या एका कृतीने त्यांची इमेज बिघडली 

दुर्देवाची गोष्ट अशी कि त्यांचा हिंदुत्ववादी स्टान्स नको तितका प्रमोट करून त्यांच्या अभिनयाची गुणवत्ता झाकोळवली गेली हे व्हायला नको होते पण सध्याचा काळ आयडियालॉजिकल डिक्टेटरशिपचा आहे आणि ह्याची सुरवात हिंदुत्ववाद्यांनी केली शत्रूशी लढता लढता आपण शत्रूसारखे बनतो ह्या नित्शेयीन न्यायाने सेक्युलॅरिस्ट पण आयडियालॉजिकल डिक्टेटरशिपकडे सरकायला लागलेत ह्यातून हातघाईचा उदय अटळ आहे ह्या हातघाईनेच गोखलेंच्या मृत्यूआधीच त्यांच्या मृत्यूची बातमी दिली गेली सोर्सेस रिलायबल आहेत कि नाही हे चेक करण्याची जबाबदारी कोणाची ? कधीकधी सोर्सेस धोखा देतात म्हणून क्षमा करून ही चर्चा थांबवणे आता आवश्यक वाटते 

गोखलेंच्या निधनामुळे जे काही झाले त्यातून एक प्रश्न मात्र निश्चित निर्माण झाला आहे कलावंताची कला व कलावंताची जीवनदृष्टी ह्यांचा संबंध कसा तपासावा ? कशाला किती महत्व द्यावं ? म्हणजे मला देशीवाद आवडत नाही पण नेमाडे लेखक म्हणून आवडतात किंवा मार्क्सवाद विवादास्पद वाटतो पण नारायण सुर्वे ,बर्टोल्ट ब्रेख्त , गॉर्की , मायकोवस्की माझे आवडते लेखक आहेत किंवा इस्लामवाद मला कधीच पटला नाही पण इकबाल मला आवडतो माझं स्वतःचं स्पष्ट मत असं आहे कि अव्वल दर्जाचा कलावंत कला निर्माण करताना नेहमीच त्याच्या विचारप्रणालीला ओलांडून थेट आयुष्यात उतरतो आणि त्या आयुष्याला अभिव्यक्ती देतो साहजिकच ते वाचताना आपणाला भिडते ते त्याने व्यक्त केलेले आयुष्य ! त्याने व्यक्त केलेली माणसे ! अभिनयासंदर्भात व्यक्तिरेखा ! द्विधाता किंवा बॅरिस्टर सारख्या कलाकृतीत विक्रम गोखले अभिनयाचा अव्वल दर्जा ठेवून व्यक्तिरेखा उभारतात म्हणून आपण त्यांना चांगले अभिनेते मानतो . 

गोखले गेले एक उत्तम अभिनेता गेला , त्यांना माझी आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, September 20, 2022

 तुम्ही इंग्लिश मीडियममध्ये शिकलाय ना किमान आपल्या मुलांना इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय ना ? मग मराठी चित्रपटांना ऑडियन्स नाही म्हणून बोंब काय मारता ? केवळ तुमचे पिक्चर्स चालावेत म्हणून अंगवळणी पडलेल्या इंग्लिशचा इंग्लिश हिंदी चित्रपट पाहण्याच्या सवयीचा त्यांनी त्याग करावा का ?

श्रीधर तिळवे नाईक 

मी अडाणी मनुष्य असल्याने पाच  प्रकाराने मराठी चित्रपट पाहतो 

१ प्रायोगिक(हे मराठीत जवळजवळ नाहीतच ) वा समांतर मराठी चित्रपट म्हणजे न्यूड जैत रे जैत सिंहासन फॅन्ड्री 
२ यशस्वी व्यावसायिक चित्रपट ज्यांनी उत्तम गल्ला जमवलाय म्हणजे सैराट , टाईमपास १ , पिंजरा , सुशीला , झुंज 
३ यशस्वी धंदेवाईक चित्रपट दादा कोंडके , महेश कोठारे , सचिन , संजय जाधव ह्या सारख्या दिग्दर्शकांचे किंवा काहीवेळा टेक्निकल रिझनसाठी उदा  भानू अथैयाच्य कॉस्च्युम्सठी आर्ट डिरेक्शनसाठी उदा नितीन चंद्रकांत देसाई  अपवादात्मकवेळा अभिनयासाठी उदा लक्ष्या व अशोकसाठी अशी ही बनवाबनवी किंवा उषा चव्हाणचे काय ग सखू बोला दाजीबा 
४ मला चित्रपटापेक्षा संगीत आणि कोरियोग्राफी जास्त आवडते अत्यंत फालतू गाणीही मी चार पाच वेळा ऐकली आहेत चांगली गाणी असतील तर किमान दहादा पिंजरा , झुंज , सुशीला , सैराट , टाईमपास सारखी मेजवानी असेल तर शेकडोवेळा अलीकडे एखादे गाणेच चांगले असते ते मी खूपदा पाहतो ऐकतो राम कदम , हृदयनाथ मंगेशकर व अजय अतुलचे अनेक चित्रपट केवळ त्यांच्या संगीतासाठी मी सहन केले आहेत 
५ मैत्री ही माझ्यासाठी महत्वाची असल्याने माझ्या मित्रांचे चित्रपट पाहण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो म्हणजे किशोर कदम , अभिराम भडकमकर , मनोज जोशी ,राकेश सारंग  ह्यासारख्या माझ्या मित्रांचे चित्रपट मी प्रथम ते मित्र आहेत म्हणून पाहतो 

मी मराठी लोकांना , संस्कृतीला , माध्यमांना कचकचीत शिव्या घालतो आणि मराठी चित्रपट आणि चॅनेल्स पाहतो आपल्या लोकांना शिव्या घालायच्या नाही तर कुणाला घालायच्या असा माझा कोल्हापुरी बाणा आहे 

श्रीधर तिळवे नाईक 

Friday, July 8, 2022

 कमलासन (कमल हासन )ह्याचा विक्रम श्रीधर तिळवे नाईक 

भारतीय परंपरेत कमळ हे कुंडलिनीचं व सृजनशीलतेचं प्रतीक मानलं जातं आणि जणू नाव सार्थ करण्यासाठी कमलासन (कमळाचे आसन )  सृजनशीलतेचे नवे नवे आयाम दाखवत असतो तो मूळचा लेखक हे आता सांगितले तर अनेकांचा विश्वास बसणार नाही साहजिकच लेखक दिग्दर्शक म्हणूनच त्याला करिअर करायचे होते 

के बालचंदर ह्यांच्याकडे आलेल्या एकाच बाईकवरून फिरणाऱ्या दोन तरुणांना गुरु म्हणून त्यांनी पूर्ण वेगळे कानमंत्र दिले त्यातील एकाला सांगितली मेथड ऍक्टिंग तर दुसऱ्याला स्टाइलाईझ्ड पहिला कमलासन झाला दुसरा रजनीकांत १९७० साली मानवन मध्ये के बालचंदर ह्यांनीच त्याला लॉन्च केले दोघेही आपल्या गुरूशी इतके एकनिष्ठ कि गुरूच्या काही कार्यक्रमात एक डाव्या बाजूला तर दुसरा उजव्या बाजूला बसायचे. 

स्टॅनिस्लॅव्हस्कीची भारतीय चित्रपटातील परंपरा गजानन जहागीरदार (एफटीआयचे पहिले संचालक तेच होते )ह्यांनी सुरु केली आणि अशोक कुमारने ती स्वीकारून पुढे डेव्हलप करून सादर करायला सुरवात केली पुढे दिलीपकुमारने ती प्रस्थापित केली ह्या स्कूलमधील सर्वश्रेष्ठ अभिनेता कमलासन होय माझा स्वतःचा तो सर्वात लाडका अभिनेता आहे 

माझ्यादृष्टीने नम्बर एक कमलासन त्याच्याखालोखाल नासिरुद्दीन शहा ! सदमातला पॅशनेट प्रेमी ,पुष्पकमधला कॉमिक ,नायकन मधला दादा ,अप्पू राजातला बुटका , विक्रममधला ऍक्शन हिरो ,चाची ४२० मधली चाची, ,दशावथारमातले दहा रोल (शिवाजी गणेशनने एकाच फिल्म्समध्ये बहू (दहा) रोल्सची परंपरा सुरु केली होती मग दिलीपकुमार संजीवकुमार गोविंदा ) हे राममधला साकेथ राम आणि अनेक नृत्यप्रधानमधला नर्तक ! कमर्शियल आणि क्लासिकल दोनी शैलीत निपुण कमलासनच ! नासिरुद्दिनचे नृत्य व गाण्यातले लिपसिंकिंग म्हणजे बोंबच आहे . तो ह्या दोन गोष्टीत कमालासनपेक्षा कमी पडतो 

जो मुलगा वयाच्या सहाव्या वर्षी राष्ट्रपती नॅशनल अवॉर्ड मिळवतो तो पुढे काय करणार ते स्पष्टच होते मला स्वतःला अष्टपैलू लोकांच्याविषयी नेहमीच आदर वाटत आलाय फिल्म इंडस्ट्रीत व्ही शांताराम , गुरुदत्त , किशोरकुमार , कमलासन व धनुष अशी एक अष्टपैलूंची परंपराच आहे त्यांच्यातही कमलासन हा कदाचित सर्वश्रेष्ठ असावा कारण इतरांच्यापेक्षा मेकप हा त्याच्याकडे एक एक्स्ट्रा असेट आहे किशोरकुमार नृत्यात उरलेल्या चौघांच्या तुलनेत काहीच नाही पण गायक म्हणून अव्वल ! गुरुदत्त हा स्वतः कोरिओग्राफरही पण त्याने आपल्या नृत्यकौशल्याला फारसा वावच दिला नाही दिग्दर्शक म्हणून ह्या चौघांच्यात तो व व्ही शांताराम अव्वल ! कमलासन अभिनयात ह्या सगळ्यांचा बाप ! ज्याला कम्प्लिट ऍक्टर म्हणावा असा एकमेवाद्वितीय ! 

साहजिकच १९८० पासून मी त्याचा शक्यतो एकही चित्रपट चुकवत नाही कोल्हापूरात सर्वच त्याचे सर्वच चित्रपट रिलीज होत नसत म्हणून मी केवळ त्याच्यासाठी बेळगाव वारी करायचो पुढे एक दुजे के लिये (हा मी २५ वेळा बघितला होता )रिलीज झाल्यावर कोल्हापुरातही त्याच्या अनेक फिल्म्स रिलीज व्हायला लागल्या त्याने कोल्हापुरात नृत्यशिक्षण घेतल्याने त्याच्याविषयी त्या वयात एक वेगळे आकर्षण होते 

अश्या ह्या कलावंताला पुढे अभिनयाच्या आर्टिफिशियल विविधतेचे जेव्हा व्यसन लागले तेव्हा आमच्या दृष्टीने तो एक त्रासदायक प्रकार झाला कथा पटकथा फाफललेली व फक्त अभिनय हे समीकरण फारसे भुरळ घालत नाही 

परिणामी ओव्हरबजेट गेलेल्या फिल्म्स आणि झालेली कर्जे ह्याने कमलासन घायाळ झाला आणि त्याच्या राजकमलचा एक तरी प्रोजेक्ट सुपरहिट व्हावा म्हणून त्याचे चाहते पाण्यात देव घालून बसले ह्याच काळात गौतमीबरोबरचा ब्रेकप , सिम्रनबरोबर अफेयरच्या अफवा , सारिकाबरोबरचा घटस्फोट , अक्षराचा बौद्ध धर्म स्वीकार , कधी न्हवे ते सामाजिक रेट्यामुळे आपण ब्राम्हण आहोत अशी त्याने दिलेली कबुली , द्रविड आयडेंटिटीचा वापर करावयास त्याने दिलेला नकार आणि सेक्युलॅरिझमचे त्याने केलेले कट्टर समर्थन ह्यामुळे तो अधिकच आतबट्ट्यात गेला 

पण २०२१ पासून माहोल बदलत चाललाय आणि त्यांच्याविषयीचा कडवटपणा कमी होत चाललाय साउथचे अनेक चित्रपट नॉर्थवाल्यांनी स्वीकारल्याने दक्षिण उत्तर वाद फिल्मच्या पातळीवर मवाळ झाला आणि कमलासन अगदीच काही चुकीचं बोलत नाही असं सर्वांना वाटायला लागलं साहजिकच लोकेश कनगराज (हिंदीत कनकराज ) जेव्हा विक्रम हा विक्रमचा दुसरा भाग (सिक्वेल म्हणता येईल का ? मला शंका आहे )घेऊन आला तेव्हा वातावरण बरंच निवळलं होतं आणि फिल्मने ह्यावर्षी तमिळमध्ये सर्वाधिक गल्ला गोळा करण्याचा विक्रम केला 

लोकेशने कमलची  अभिनयातील आर्टिफिशियल विविधतेची भूक नैसर्गिक करून एकीकडे विविधता दिली पण ही विविधता व्यक्तिरेखेवर मात करणार नाही ह्याची काळजी घेतली कमलासनच्या चित्रपटात अनेकदा फक्त तोच दिसायचा इथे मात्र विजय सेथुपती व फाहद फासील ह्यांना परफेक्ट वाव दिला परिणामी कथा वधारली अलीकडे लेखक असल्याने कमलासन नको ती घुसखोरी करायचा लोकेशने त्याला लिखाणापासून दूर ठेवून कमर्शियल प्लॉटचं कमलासन अलीकडं जे भजं करायचा ते त्याला करू दिलं नाही परिणामी एक परफेक्ट कमर्शियल फिल्म दिली जिने ५०० करोडला टच केलं आहे 

मला स्वतःला सर्वाधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे कि कमलासनवर असलेलं सर्व कर्ज आता फिटेल त्याच्यासारख्या कलावंतांवर ही वेळ यायलाच नको होती पण आली साऊथच्या सर्वच कलावंतांनी त्याला सहकार्य दिलं अन्यथा मास्टरमध्ये केलेल्या व्हिलनला बॉडी लँग्वेजच्या दृष्टीने पुन्हा रिपीट करण्यात विजय सेथुपतीला काय इंटरेस्ट असणार ? आणि सूर्या चक्क कॅमिओ व्हिलन ! पण कमलासन बरोबर काम करण्याची संधी व त्यांची कर्जापासून मुक्तता व्हावी म्हणून असलेली कळकळ  ह्यांनी हे सहकार्य निर्माण केलं 

कमलासनचे राजकीय विचार मला अनेकदा पटले नाहीत पण कलावंताचे राजकीय विचार व त्याची कला ह्या दोन गोष्टी आपण वेगळ्या केल्या पाहिजेत असं मी मानतो सामाजिक बाबतीत तो समाज मागे न्हेत नाही ना एव्हढं मात्र मी अवश्य पाहतो कमलासन कायमच सामाजिक पातळीवर पुढारलेला होता व आताही आहे त्यामुळे तो हिट होणं गरजेचं होतं तो झाला ह्याबद्दल त्याचे व लोकेशचे मनापासून आभार ! विजय सेथुपतीने आता व्हिलनची काम करणं थांबवावं जेवढे व्हिलन त्याने केले ते खूप झाले आम्ही आता काही वेगळं पहायला उत्सुक आहोत जे फक्त तोच देऊ शकतो . 


श्रीधर तिळवे नाईक 







Saturday, December 12, 2020

 आर्या बॅनर्जी गेली श्रीधर तिळवे नाईक होतं 



भारतात शास्त्रीय संगीतात एक वाद नेहमीच चालू असतो निखिल बॅनर्जी श्रेष्ठ कि रविशंकर श्रेष्ठ ? वास्तविक दोघेही मल्हार घराण्याचे आणि दोघांनीही सतार जगप्रसिद्ध केली पण रवीशंकर जगभर जसा प्रचार करत हिंडले तसे निखिल बॅनर्जी हिंडले नाहीत रविशंकर प्रायोगिक होते तर निखिल बॅनर्जी समांतर दोघांनीही परंपरेचे अनुकरण न करता तिला ताजगी दिली उस्ताद अल्लाउद्दीन खान ह्यांचे हे दोघेही शिष्य पण निखिल बॅनर्जी परंपरेकडे जास्त कललेले ! दोघेही मेस्ट्रो म्हणजे दादा ! तिसरे अर्थातच विलायत खान !

आर्या बॅनर्जींशी माझी पहिली मिटिंग झाली तेव्हा मला माहित न्हवतं कि ती निखिल बॅनर्जींची कन्या आहे तिने संगीतात मास्टर डिग्री प्राप्त केली होती म्हणून मी तिला गंमतीत छेडलं होतं आणि निखिल बॅनर्जी विरुद्ध रविशंकर असा वाद सुरु झाला मी तिला सांगितलं कि माझे वडील निखिल बॅनर्जींचे फॅन आहेत ते तिला आवडलं मी निखिल बॅनर्जींचं योगदान नाकारत न्हवतो पण रविशंकर हे अधिक प्रायोगिक होते असं माझं मत होतं आणि तिला ते मान्य न्हवतं निघताना तिनं सांगितलं कि मी निखिल बॅनर्जींची कन्या आहे साहजिकच मग पुन्हा भेटू असा वादा करून आम्ही वेगळे झालो 

दुसऱ्या मीटिंगमध्ये मात्र सत्यजित रे पासून गोडार्ड पर्यंत सर्वांच्यावर चर्चा सुरु झाली मी ऋत्विज घटकांचा फॅन आणि तीही ! मिटिंग संपल्यावर तिने पिण्याची ऑफर दिली मी दारू पीत नाही म्हणून सांगितले तिला तो धक्का होता सिरियसली ? तिने विचारले मी म्हणालो हो मी दारू सिगरेट वैग्रे काहीही भानगडी करत नाही का हा पुढचा प्रश्न आला मी म्हणालो मोक्ष ! ती फक्त इंटरेस्टिंग म्हणाली आणि निघून गेली 

मग मिटींगा सुरु झाल्या तिने जगातले उत्तम चित्रपट पाहिले होते ती उत्कृष्ट कुक होती वेगवेगळ्या डिशेस बनवण्याची शौकीन ! तिचे जगाचा आस्वाद घेण्याचे स्वतःचे काही फ़ंडे होते पण कुठेही सौंदर्यतोल ढळायचे नाहीत एक प्रकारचा बंगाली अभिजातपणा तिच्या बॉडीलँग्वेजमध्ये वावरत राहायचा  आपण पुरेसे सुंदर नाही आहोत असा तिला कॉम्प्लेक्स असावा पण ती तो बोलून दाखवायचा नाही मी मात्र तिला कायमच सुन्दर आणि स्मार्ट म्हणायचो तिच्या डोळ्यात एक आर्तता असायची आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणाऱ्या मुसाफिराची मुंबई शहरात ती एकटी होती आणि तिचे फक्त चार पाचच मित्र असावेत 

माझ्या ऍरोगन्सला सुरवातीला नाके मुरडणारी ती तो जन्मजात आहे हे लक्ष्यात येताच सरावली . गोव्याबद्दल तिला उत्सुकता होती आणि मी गोवन नाही ह्याची तिला माझ्या कोल्हापुरी भाषेवरून खात्रीच पटली होती तिचे मूळ नाव देवदत्ता होते पण ते लांब वाटल्याने तिने आर्या हे नाव घेतले 

आर्या बॅनर्जी गेली . अनपेक्षित आणि धक्कादायक ! पोलीस योग्य ते सत्य शोधतीलच पण ती गेली ह्या सत्याचं करायचं काय ?

 तिचा पहिला चित्रपट लव्ह सेक्स अँड धोखा हिट झाला आणि ती लाइमलाईटमध्ये आली ह्या चित्रपटातील तिचा अभिनय अफलातून होता कारण तिने सादर केलेली व्यक्तिरेखा तिच्या मूळ व्यक्तिरेखेशी अजिबात जुळणारी न्हवती तिने त्या रोलसाठी कायापालट केला होता प्रत्यक्ष आयुष्यात अत्यंत सुशील आणि एटीकेट असणारी आर्या  फिल्ममधे कसलेही एटीकेट नसलेल्या शिवराळ आणि फ्रष्टेशन डुबलेल्या गायिकेच्या व्यक्तिरेखेच्या बोल्ड अवतारात होती ह्यांनंतर तिची करिअरची गाडी वेगाने धावेल असं सर्वांना वाटलं होतं पण प्रत्यक्षात असं घडलं नाही बॉलिवूड तिला बोल्ड अवतारात टाईपकास्ट करू पहात होतं आणि आर्याला टाईपकास्ट व्हायचं न्हवतं ह्याचा व्हायचा तो परिणाम झाला ऑफर लिमिटेड झाल्या 

एके दिवशी तिचा फोन आला म्हणाली ,"मला शकिलाविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे " मला सुरवातीला बॉलिवूडची शकीला वाटली मग कळलं कि तिला साऊथच्या सेक्स सायरनविषयी जाणून घ्यायचं आहे मी मला माहीत असलेल्या शकीलाच्या गोष्टींविषयी बोललो मग कळलं कि तिला डर्टी पिक्चर ऑफर झालाय मला हा रोल तिने करावा हे पटलं नाही एडिटिंग मध्ये काही शिल्लक राहणार नाही अशी मला शक्यता वाटत होती पण तिचा प्रश्न सडेतोड होता एकता कपूर ही माझी मेंटॉर आहे मी तिला नाही कशी म्हणू शकते ? शिवाय विद्या बालन हे आकर्षण होते तिने शकिलाला योग्य तो न्याय दिला होता पण रोल मर्यादित लांबीचा झाला होता हाही चित्रपट सुपरहिट झाला 

दोन चित्रपट हिट दिल्यावरही आर्याला ऑफर येईनात हे धक्कादायक होते तिच्याबरोबर ह्या लव्ह सेक्स और धोखा ह्या चित्रपटात काम केलेली नुसरत भरुचा ही कुठल्याकुठे निघून गेली पण आर्याच्या वाट्याला असे काही आले नाही बॉलिवूड यश बघते म्हणतात पण आर्याच्या दोन्ही फिल्म्स हिट होऊनही तिला चित्रपट मिळेनात तेव्हा नेमकं काय केलं कि बॉलिवूड ऑफर देईल अशा चर्चा सुरु झाल्या ह्यातून एक हिरोईन ओरिएंटेड फिल्मचा मुद्दा पुढे आला 

दरम्यान तिने गोव्यावर आधारित एक फिल्म सावधान इंडियासाठी स्वीकारली आणि तुझ्या प्रदेशात शूटिंग करतीये म्हणून फोन केले माझ्यासाठी हेही धक्कादायक होते . बॉलिवूडमध्ये तुम्ही सावधान इंडिया क्राईम पेट्रोलमधून फिल्ममधे जाणे हे मानाचे व फिल्ममधून सावधान इंडिया क्राईम पेट्रोलमध्ये येणे हे बेकारीचे लक्षण मानले जाते पण हे समजून घ्यायची तिची तयारीच न्हवती दिग्दर्शक मोठा आहे म्हणून तिने हे काम केले आणि मला स्लॉट कळवून मतही विचारले हेही काम तिने मनापासून केले होते 

मग एक बंगाली फिल्म आल्याची व त्यासाठी परदेशात जाणार असल्याची माहिती तिने दिली . फिल्म हे तिचे माध्यम असल्याने मी आनंदलो . 

दरम्यान मी तिच्या टॅलेंटला न्याय देईल अशी एक हिरॉईन ओरिएंटेड फिल्म लिहायला घेतली आणि पूर्ण केली तिला ती अतिशय आवडली आणि आम्ही काही काम करायला सुरवात करणार तोच मला अपघात झाला मग माझ्या बहिणीचा मृत्यू मग भावाचा मृत्यू अशी एक मालिका सुरु झाली ह्याचवेळी तिच्याही जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून ती कलकत्याला निघून गेली मग दुसऱ्या दिवशी फोन आला म्हणाली ,"तू कलकत्याला ये मला इथे विश्वासार्ह माणूस हवं आहे आणि तुझ्याखेरीज मला कुणी दिसत नाही " मी स्वतः माझ्या अपघात  मालिकेत अडकलेलो आणि मोक्षाच्या वाटेवर उमलत चाललेलो ! माझ्या कामवासनेचा अस्त मला साधलेला ! ह्या दोन्ही कारणांमुळे मी नाही म्हणालो तिला मला गृहीत धरल्याने माझे नाही म्हणणे हे तिला अनपेक्षित होतं तिने त्यानंतर माझ्याशी संबंध तोडले ते कायमचेच !मी फोन केले तिने उचलले नाहीत मग मीही थांबलो 

आणि आज चार वर्षांनी थेट बातमी आली . कलकत्याच्या तिच्या घरात तिची डेड बॉडी सापडली . दारू पिऊन लिव्हर खराब झालेले आणि तब्बल दोन लिटर दारू पोटात ! नशेत कार्डियाक अटॅक आला पण तिला तो कळला नाही ! खरेतर तिचा जबरदस्त कंट्रोल होता हा कंट्रोल सुटला कधी ?

ती एकांतप्रिय होती आपण भलं आपलं आयुष्य भलं असा तिचा स्वभाव होता मात्र एखादी व्यक्तिरेखा सादर करायची म्हंटली कि तिच्या अंगात भूत संचारायचे सगळे तपशील गोळा करून त्या व्यक्तिरेखेची  बॉडी लँग्वेज तयार करून ती त्यात स्वतःला ढाळायची त्या जीवावरच तिने डर्टी पिक्चरमध्ये विद्या बालनला तोडीस तोड अभिनय केला होता दुर्देवाने बॉलीवूडने तिच्या अभिनयप्रतिभेला न्याय दिला नाही हे शल्य बोचत राहिल्याने तिचा कंट्रोल सुटला ?

मी कलकत्याला गेलो असतो तर हे टळले असते ? तिचे वडील संगीताला अध्यात्मिक साधना समजायचे हा वारसा तिच्याकडे का सरकला नाही ? मी तिला मेडिटेशनचे काही धडे दिले होते पण मुळातच तिचा स्वभाव न्हवता . तिच्या आत असलेल्या अस्तित्वाच्या अध्यात्मिक पोकळीने तिला गिळले ?

तिच्या वडिलांच्याप्रमाणे तिलाही संगीत जीव कि प्राण होते मी न ऐकलेल्या अनेक चिजा तिने मला सांगितल्या काहींच्या सीडीज आणल्या काहींच्या बनवून दिल्या तिचा आवाज सर्वस्वी तिचा होता आणि ती अफलातून गायची ती उत्तम फिल्मी गायिका झाली असती गीतादत्त तिला आवडायची वक्तने किया क्या हसी सितम हे आम्हा दोघांचेही फेव्हरेट ! तिने ते माझ्यापुढे दोनवेळा तरी गायिले असेल . गीतादत्तची काळीज चिरत जाणारी तासीर आणि आर्तता तिच्याकडेही होती 

आपल्या भावना फार कमी वेळा ती व्यक्त करायची वडील लहानपणी गेल्याने एक पोरकेपण तिच्या आयुष्याला व्यापून होते वडिलांच्या नावाला आपल्यामुळे धक्का बसू नये ह्यासाठी ती खूप काळजीपूर्वक बोलायची आणि वागायची भिडस्तपणा हा आम्हां दोघांचाही दुर्गुण होता त्यामुळे लोकांच्याकडे काम मागणे व्हायचे नाही आणि बॉलिवूडमध्ये तुम्ही मागितल्याशिवाय कोणी काम देत नाही तिचा भिडस्तपणा तिला नडला . 

माझ्या लेखी ती एक उत्कृष्ट मैत्रीण होती . हळव्या बंगाली संवेदनशीलतेने भरलेली आणि आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन बाळगणारी व कलेतील अभिजात पर्यावरणाचे भान बाळगणारी बुद्धिमती ! आम्ही आमनेसामने भेटलो कि सगळं विसरून पुन्हा मित्र होऊ अशी मला खात्रीच होती . ती खात्री कायमची नाहीशी झाली . 

तिच्या अव्वल दर्जाच्या प्रतिभेला सॅल्यूट आणि आदरांजली !

श्रीधर तिळवे नाईक 

 





Tuesday, August 18, 2020

गुलज़ारवरचं मराठी लोकांचं प्रेम पाहून मला कधीकधी शंका येते गालिब हा मराठी कवी होता काय ?

Monday, August 17, 2020

निशिकांत कामत  श्रीधर तिळवे नाईक

निशी गेला आमच्या रुइया कट्ट्यावरचे एक ध्यासपर्व संपले अत्यंत मितभाषी , हुशार , दुःखाच्या गर्तेत बुडालेले डोळे घेऊन फिरणारा निशी मला प्रथम कट्ट्यावरच भेटला विषय अर्थातच भविष्य मला फ्लॅशेस  येतात हे रुईयाभर झाल्याने ह्या काळातल्या माझ्या अनेक ओळखी ह्या फ्लॅशेसनं व्हायच्या त्यातून पुढे एक गॅंग तयार होत गेली ह्यातले काही कॉलेजचे काही कट्ट्याचे मेम्बर्स निशी रुईया कॉलेजचाच ! मी चुकत नसेन तर कल्चरल सेक्रेटरीही झाला आमच्या ह्या गॅंगपूर्वी रुईयातल्या दोन गॅंग गाजल्या होत्या एक कवींची आणि दुसरी नाटकवाल्यांची विनय आपटे तिचा लीडर मात्र आमच्यापुढे त्यावेळी ह्या गँगचं नेतृत्व होतं ते महेश मांजरेकरकडं आमची तिसरी गॅंग होती जी स्वतंत्र असली तरी महेश मांजरेकरांच्या गॅंग विषयी अत्यंत आदर बाळगून होती आणि तिच्यात ज्ञानदा , प्रवीण दामले , मी असे कवीही होते आणि गजेंद्र अहिरे शेखर सरतांडेल सारखे नाटक फिल्मवालेही होते सर्वांच्याच सम्पर्कात असायची महेश मांजरेकर गँगचा अजय फणसेकर माझा बऱ्यापैकी जिवलग होता आणि तो निशिकांत कामतला घेऊन आला  आणि आमची ओळख झाली रुईयातल्या अनेकांच्याप्रमाणं त्याला सुपरस्टार व्हायचं होतं आणि अभिनयात करिअर होईल का हा त्याचा प्रश्न होता आणि दुसरा मी इथे सांगणार नाही मी उत्तर देऊ शकलो नाही कारण मला काही निशीबाबत फ्लॅश येईना मग त्याच्या दोन वाऱ्या झाल्या आम्ही ओळखायला लागलो आणि अचानक हा डीपीसमोर असतांना मला किक आली मी त्याला बोलावलं आणि म्हणालो डिरेक्शन्सचाही विचार कर !
म्हणजे अभिनेता म्हणून यश नाही
तस नाही पण अभिनेता म्हणून तुला जे भव्य यश हवं ते मला दिसत नाहीये

साहजिकच नंतर तो मला टाळायला लागला निगेटिव्ह प्रेडिक्शननंतर येणाऱ्या अशा रिऍक्शन्सची मला सवय झाली होती कारण कोल्हापुरात असतांना व्हायोलण्ट रिऍक्शन्सनाही  मला सामोरं जावं लागलं होतं ह्याबाबत माझा अटीट्युड जे दिसले ते  दिसले जे उखडायचं ते उखाडा असाच असायचा मग काही महिन्यांनी माझं दुसरं म्हणणं खरं झाल्याने तो आला आणि सोर्री म्हणाला मग आमचे संबंध चांगले झाले ते शेवटपर्यंत चांगलेच राहिले हळूहळू मी कवी वैगरेही आहे हे त्याला कळालं आणि नात्याला कलावंती किनार आली आम्ही दोघेही मराठी असलो तरी गोवन व कन्नड संस्कृतीचाही आमच्यावर थोडा परिणाम होता ज्याने कनेक्टिव्हिटी डेन्स केली

निशी टीचर्स फॅमिलीतून आला होता आणि आई संस्कृतची शिक्षिका असल्याने परंपरेशी त्याचे एक नाते होते

निशित एक आत्मधुंदता होती आणि ती ह्या व्यवहारी जगात कशी शाबूत ठेवायची हे त्याला सुरवातीला कळत न्हवते हळूहळू तो समतोल साधायला सरावला त्याचे कौटुंबिक आयुष्य त्यावेळी त्याला अकारण गुंतागुंतीचे वाटत होते हळूहळू त्याला मार्ग सापडायला लागला मीनव्हाईल तो थोडे एडिटिंगही शिकायला लागला आणि पुढे तो तीन वर्षे फक्त एडिटर म्हणून काम करणार  होता

कॅनरा आणि तुळू ह्या दोन संस्कृतीत (उत्तरेत मारवाडी बोहरा गुजराती असे आहेत )पैशाला असाधारण महत्व आहे तुम्ही पैसे कमावले नाहित कि तुम्हाला काही महत्त्व रहात नाही पण ह्याचा एक फायदाही असतो ह्या दोन्ही संस्कृतीतले लोक तुम्हाला मदत करायलाही तयार असतात ह्या संस्कृतीचा दबाव निशीवर ह्या काळात होता आपण पैसे कमावले पाहीजेत असं त्याला वाटायचे रुईया दादर माटुंगात असल्याने ह्या संस्कृतीचा परिणाम अटळ होता कॉस्मोपॉलिटन मराठी संस्कृती हे रुईयाचं वैशिष्ट्य जे आम्हा सगळ्यांच्यातच उतरलं त्याला निशी अपवाद न्हवता

निशी हळूहळू छोटीछोटी कामे करत फिल्म इंडस्ट्रीत पाय रोवू लागला त्याचा मुख्य रस हा अभिनयातच होता मात्र त्याला कामे दिग्दर्शक म्हणून मिळायला लागली त्यामुळे अभिनयाबाबत मात्र आता गाडा सुपरस्टार झालो नाही तरी किमान उत्तम अभिनेता म्हणून नाव कमवेन असा झाला होता हवा आने दे हा डेब्यू असला तरी त्याला खरा ब्रेकथ्रू मिळाला तो सातच्या आत घरात मधून ! संजय सुरकरची माझ्या मते ही बेस्ट फिल्म ! ह्यातला अनिकेत हा ग्रे होता आणि निशिकांतने स्टाईल देत तो उत्तम पेलला मराठीला अलका कुबल व सचिंन टाईप टाइपमधून ज्यांनी बाहेर काढलं त्यातील ही एक फिल्म होती आणि त्यात निशीचाही वाटा होता ह्यादरम्यान आपणाला लग्न हवं आहे कि नाही ह्या त्याच्या डोक्यातल्या क्रायसिसला एक सुस्पष्ट आकार मिळायला लागला

माणसाला एकटेपणाचं ओझं तो अध्यात्मिक नसेल तर सहसा पेलत नाही निशिकांत आयुष्यभर एकट्याचे आयुष्य जगायचा प्रयत्न करत होता आणि त्याला ते झेपत न्हवते ह्यावर उपाय एकच होता सततचे काम !

आणि मग तो फिल्म इंडस्ट्रीतील जादुई क्षण आला निशीला डोंबिवली फास्ट मिळाला फॉलिंग डाऊन वर आधारित ह्या फिल्मने त्याला सर्वकाही दिले ह्या फिल्मला मराठीचे नॅशनल अवॉर्डही मिळाले फिल्म हिट झाली आणि तमिळमध्ये त्याचा रिमेक बनला मग हिंदीतला ब्रेक मुंबई मेरी जान आला दुर्देवाने ही फिल्म चालली नाही मग निशीचा रिस्क घ्यायचा उत्साह संपला व त्याने अत्यंत सेफ गेम खेळला फोर्स  फिल्म ऑलरेडी हिट होती
तिचा रिमेक बनवला मग दृश्यमचा रिमेक !दृश्यम हिट झाल्यावर निशीने पुन्हा एक मोठी रिस्क घेतली अक्टिंगवर रॉकी हँडसम त्याने दिग्दर्शन केले आणि अभिनयही ह्यातला व्हिलन जबरदस्त होता पण फिल्म चालली नाही निशिकांतने तो उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा सिद्ध केलं ह्यानंतर मात्र त्याच्या तब्येतीच्या तक्रारी डोकं वर काढायला लागल्या दिगदर्शनाची जबाबदारी घ्यावी कि न घ्यावी हा प्रश्न निर्माण झाला कारण दिग्दर्शन हे नेहमीच इर्रेग्युलर शेड्युलमुळे लाईफस्टाईल डिसीज घेऊन येतं निशीने अभिनयावर लक्ष्य केंद्रित केले

निशी हा खरेतर मूळचा अभिनेताच किंबहुना रुईयावर सगळे मूळचे अभिनेतेच पण जवळजवळ प्रत्येकाने नाव कमावले ते दिग्दर्शक म्हणून निशीने रुईया गँग्जची ही परंपरा टिकवली महेश मांजरेकरनंतर तोच एक असा होता ज्याचे हिंदीतही नाव होते

आजही निशी म्हंटलं कि मला आठवते ती त्याची शांतता आणि पॉजेस सक्सेसच्या आड अनेकांना ती दिसायची नाही बरं स्क्रॅच करून आतला निशी काढणं हेही जवळ जवळ अशक्य एखाद्या माणसाने समुद्र लपवावा आणि पाणपोई दाखवावी तसा तो होता

तो गेल्याने अख्खा रुईया कट्टा हळहळला असणार ह्याविषयी माझ्या मनात शंका नाही काही दिवस तरी प्रत्येकाच्या काळजात पाली चुकचुकतील

निशाला माझा अखेरचा गुड बाय तो पॅकेजडील मधल्या पॅकेजला व्हिसा म्हणायचा मला खात्री आहे त्याच्या खिश्यात व्हिसा सापडणार नाही

श्रीधर तिळवे नाईक 


















Friday, July 3, 2020

सरोजखान अदाकारीची राणी श्रीधर तिळवे नाईक

सरोज खान गेल्या धकधक अरेस्ट झाल्याने गेल्या त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही कदाचित कारण क्रिएटिव्ह माणसं पैशाला पाच मिळतात अशी बॉलिवूडची गैरसमजूत आहे

त्यांची माझी भेट राजकुमार संतोषींच्या साल्याने किंवा चुलत साल्याने करून दिली होती मला  जोशी कि कांबळेसाठी झी अवॉर्ड मिळालं होतं आणि त्यामुळे ही ऑफर आली होती कुठल्याही नवीन डिरेक्टरला बॉलिवूडमधली अनुभवी माणसं चाचपून बघत बसतात माझीही चाचपणी होणार ह्याची मला कल्पना होती बाईंनी मी त्यांचं कुठलं कुठलं काम बघितलंय म्हणून विचारलं मी म्हणालो मी लिरिकल कोरिओग्राफीचा कट्टर पुरस्कर्ता आहे म्हणून तुमच्याकडं आलोय त्या एका वाक्यानं बाई बदलल्या कारण बाई स्वतः लिरिकलच्या कट्टर समर्थक होत्या साहजिकच मग गाडी त्याच अंगाने गेली त्यांचा व्यासंग प्रचंड होता अनेक गाणी त्यांनी बघितली होती शेवटी त्या म्हणाला ."मला वेळ कमी आहे पण दोन गाणी मी करते "

बाई संपूर्ण चित्रपट करतात हे ऐकून होतो साला म्हणाला ह्याचा अर्थ उरलेली गाणी त्यांचा असिस्टंट करणार मला प्रॉब्लेम न्हवता चित्रपट झाला नाही पण बाई मनात ठसल्या त्या ठसल्याच

नृत्यावरची त्यांची निष्ठा केवळ वादातीत होती त्यांचे स्कूल काहीसे पारंपरिक होते पण त्यात नवे युग भरण्याची त्यांची ताकद होती त्यांची दोन गाणी ही माझ्या मते पॉप कोरिओग्राफीमधली माईलस्टोन आहेत पहिले क्लब स्टेज डान्सची परिभाषा बदलून टाकणारे तेजाब मधले एक दो तीन आणि दुसरे सेन्शुअस गाण्यातील बेटामधले  धक धक करने लगा परंपरेत राहूनही किती उत्कृष्ट काम करता येते त्याची ही दोन्ही गाणी उदाहरणे आहेत एक दो तीन ने मॉब हँडलिंग आणि रॅम्प वॊकिंग स्टेजच्या वापराचे नवे आयाम सादर केले हे त्यांनीच शोधलेले आयाम हमको आजकल है इंतजार मध्ये त्यांनी मोशन स्लो करत फार परिणामकारकतेने वापरले

धकधकला त्यांनी एक साधा गोठा किती लेव्हलला जाऊन सेन्शुअस करता येतो ह्याचे एक उदाहरणच प्रस्तुत केले हे ड्युएट होते तरीही ते कुठेही अश्लील न करता मादकतेची सगळी उंची ह्यात गाठली गेली ह्या गाण्यातली नायिका म्हणजे स्फोटक मादक दारूचे कोठार आहे शृंगार आणि लैंगिक भ्रम अश्लीलतेला टच करतात पण परततात ते अश्लीलतेत घुसत नाहीत मुखमुद्रा  आणि हस्तमुद्रा ह्या बाईंच्यापुढे हात जोडून उभ्या असत आणि कानात सांगत ही अशी अदाकारी करूया तामझामपेक्षा अदाकारी महत्वाची हे बाईंचे तत्वच होते

त्यांचे स्वतःचे आयुष्य म्हणजे एक निरंतर संघर्ष होता त्या ह्या संघर्षाच्या अनुभवातून बोलत स्पष्टवक्तेपणा हा त्यांच्या स्वभावातच होता केवळ कॉपी करणारे कोरिओग्राफर त्यांना चीड आणत चौथ्या नवतेत नृत्य आणि नृत ह्यांना समान महत्व आहे त्यांनी हा बदल स्वीकारला नाही त्या कायमच नृत्याची भाषा बोलत राहिल्या

आणि आता त्या गेल्या त्यांना माझी आदरांजली


श्रीधर तिळवे नाईक



इरफान 

Sunday, December 15, 2019

दर वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी मुंबई विद्यापीठाच्या थिएटर अकादमीत एक तासाची ३८ व्याख्याने दिली मला वेळ मिळाला तर आणखी बहुदा ६२ व्याख्याने देईन कधीकाळी पीएचडीसाठी केलेले लिखाण सादर करणे असे त्याचे स्वरूप असले तरी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्यामुळे  ही व्याख्याने इंटरेस्टिंग बनतात माझ्या व्याख्यानांना इंटरनेट व त्यामुळे गूगल वापरण्याची नेहमीच अनुमती असते त्यामुळे विध्यार्थी काहीही विचारत असतात त्यांना इंटरेस्टिंग वाटेल ते दाखवत असतात कधीकधी गूगललाही दुरुस्त करायची वेळ येते विषय नाटक संहिता इझम्स असे असले  तरी माझ्या वर्गात रिअल नंबर व रॅशनल नंबर ह्यांच्यात फरक काय असा प्रश्न  रिऍलिझम संदर्भात एखादा मॅथ्सचा विद्यार्थी विचारतो  तर एखादा रॅशनॅलिझमच्या संदर्भात मुसलमानांचे ऑप्टिक्समधले योगदान सांगितले कि न्यूटनच्या आणि अल हायझ च्या ऑप्टिक्स मधला फरक विचारतो सगळ्या शाखा प्रशांखाची घुसळण माझ्या वर्गात होत असते एखादीचे आई आणि वडील दोघेही पोलीस असतात आणि तरीही हैद्राबादच्या रेप केसनंतर ती जेव्हा माझी आई पोलीस असूनही कधी कधी घाबरते असं सांगते तेव्हा काय प्रकारची असुरक्षितता आपण पसरवून ठेवलीये ते स्पष्ट कळते

ह्यावर्षी विद्यार्थ्यांनी आणि मंगेशने आग्रह धरल्यामुळे आणि ह्या आग्रहाला योगेश सोमण ह्यांनी मान दिल्याने मला बोलावले गेले अन्यथा ---- विद्यार्थ्यांचे मिळणारे प्रेम आणि वैयक्तिक प्रश्नांची चर्चा करताना सर आपल्या भल्याचाच विचार करतील हा त्यांनी दाखवलेला विश्वास मला नेहमीच महत्वाचा वाटत आलाय

नवीन पिढीला त्यांच्या पद्धतीने शिकवले कि हमखास प्रतिसाद मिळतो असा माझा अनुभव आहे छापीलतेत अडकलेल्या लोकांना हे पटवायचे कसे हा खरा प्रश्न आहे

श्रीधर तिळवे नाईक 

Tuesday, August 20, 2019

खय्यामना आमच्या पिढीने ऐकले ते कभी कभी त्रिशूल पासून ते एव्हढे क्लासी संगीतकार आहेत ह्याची आम्हाला कल्पनाच न्हवती त्यांचं तोंडात बसलेलं पहिलं गाणं गापूची गापूची गम गम हे त्रिशूल मधलं लहानपणासाठी असली गाणी परफेक्ट !  पुढे संगीताची अधिक अक्कल आली आणि डान्ससाठी सोकावलेलं माझं शरीर डान्सिकल गाण्याव्यतिरिक्त मेलडीही ऐकायला लागले पुढे लक्ष्यात आले कि खय्यामसाहेबांची क्लासिकल इमेज इतकी त्यांच्या फॅन्सनी मोठी केलीये कि गापूची व तेरे चेहरेसे व मौसम मौसम लव्हली मौसम(थोडीसी बेवफाई ) सारखी गाणी चक्क कानाआड केली जातायत

लता मंगेशकरांनी त्यांचे सर्वात बेस्ट गाणे म्हणून रझिया सुलतान मधले ए दिले नादान निवडले तेव्हा थोडा धक्का बसला होता पण नंतर कळले कि बाई अधूनमधून घोषणा करत असतात मात्र हे एक अफलातून गाणे होते एव्हढे निश्चित

बाजार आणि उमराव जान कळस होते एका अर्थाने आमच्या पिढीने त्यांचा बेस्ट फॉर्म बघितला

त्याआधीची त्यांची "हे कली कली के लंबपर " " बहारो मेरा जीवनभी संवारो "  " श्यामे गमकी कसम "  "तू ही सागर तूही किनारा( हे सुलक्षणा पंडितने पंडितने गायलेले गाणे तिला फिल्मफेयर देऊन गेले होते )" ही माधुर्याने भरलेली गाणी कानांना खिळवून ठेवणारी होती

गीतांच्या बोलाबाबत ते गीतात काव्य असण्याबद्दल सजग होते आणि त्यामुळेच बावरी चा अपवाद वगळता आनंद बक्षीच्या वाट्याला ते फारसे गेले नाहीत गुणवत्तेचा आग्रह हा तुम्ही जर यशस्वीही झालात तर ऐकून घेतला जातो जसा कि तो नौशादबाबत ऐकून घेतला गेला खय्यामच्या नशिबाने ह्याबाबत १९८५ नंतर पुन्हा पलटी मारायला सुरवात केली आणि एकापाठोपाठ एक फिल्म्स फ्लॉप व्हायला लागल्या हिट है तो फिट है ह्या चालीने चालणाऱ्या बॉलिवूडमध्ये हे परवडणारे न्हवते त्यातच नंतर बप्पी लाहिरीच्या हिम्मतवालाने संगीताचा बाज पूर्णच बदलला आम्ही लोक आता तरुण झालो होतो आणि आम्हाला फक्त नाचायचं होतं ऐकायचं न्हवतंच बाप्पीची गाणी नाचायला लय भारी असल्याने आम्ही ता थय्या ता थय्या करत बसलो आम्ही खय्याम फेकूनच दिला खरंतर आणि त्यातच त्यांच्या फिल्म्स वाईट होत्या आता संगीतासाठी फिल्म्स बघण्याचा जमाना संपला होता कारण कॅसेट्स आल्या होत्या खय्यामसाठी वाईट फिल्मा बघण्यापेक्षा त्यांचं संगीत कॅसेटवर ऐकणे आमच्या फाटक्या खिशाला परवडेबल होतं नदीम श्रवणमुळे मेलडी परत आली तरी ही मेलडी अभिजात न्हवती तिच्यात एक कामचलाऊपणा होता खय्याम अभिजात होते त्यामुळे फिट्ट होईनात बरं १९८७ नंतरची गाणी आधीच्या दर्जाला मॅच होणारी न्हवती शिवाय नदीम श्रवण संगीतात एक तरी गाणे डान्ससाठी बनवायचे म्हणजे साजण मध्ये देखा हैं पहली बार साजणकी आँखोंमे प्यार हे डान्सिकल होतेच खय्याम असे गाणे देऊ शकत नाहीत अशी त्यांची व इतरांची पण समजूत होती वास्तविक ते डान्सिकल गाणी देऊ शकले असते पण त्यासाठी यश चोप्रासारखा डिरेक्टर असणे आवश्यक होते आणि खय्यामच्या नशिबी तेच न्हवते खय्यामच्या ५० टक्के हिट फिल्म्स यश चोप्रा कॅम्पशी निगडित आहेत ते त्यामुळेच ! अभिजातला सामावून घेण्यासाठी अभिजात दिग्दर्शक लागतात आणि इंडस्ट्रीत स्टारडम फॅशनमुळे त्याचाच अभाव आहे खय्यामना ह्याचा फटका बसला

खय्याम नौशाद स्कूलचे असले तरी त्यांनी पूर्णपणे आपला स्वतंत्र ठसा उमटवला त्यांचा जसा वापर करून घ्यायला हवा होता तसा झाला नाही भारतातील सर्वात मोठी शोकांतिका जर कुठली असेल तर ती म्हणजे इथे पॉप संगीत हे कायमच चित्रपटसंगीताशी जोडले जाते मग गायनाशी परिणामी जोवर एखादा संगीतकार चित्रपटात यशस्वी होत नाही तोवर त्याला मान्यता मिळणे कठीण जाते एकंदरच सगळ्या गोष्टीची खिचडी करण्याचा आपला स्वभाव संगीतालाही लागू होतो

खय्याम गेले आणि आता अभिजात मेलडीचे काय असा प्रश्नच निर्माण झालाय ओ पी नय्यर हृदयनाथ मंगेशकर जयदेव आणि खय्याम ह्यांनी मेलडीला जे माधुर्य दिले ते अवर्णनीय आहे ते कायमच आपल्यासोबत राहील प्रश्न हाच आहे कि २१ व्या शतकात ह्या मेलडीयस माधुर्याचं काय होणार आहे ?

श्रीधर तिळवे नाईक


Friday, July 5, 2019

Tuesday, March 7, 2017

धंदेवाईक , प्रायोगिक , समांतर आणि प्रायोगिक श्रीधर तिळवे नाईक 

कुठलीही कला (चित्रपट) संस्कृती यशस्वी होण्यासाठी तिच्यात
१ धंदेवाईक
२ व्यावसायिक
३ समांतर आणि
४ प्रायोगिक कलाकृती येत राहणे गरजेचं असतं ह्यातील प्रायोगिकला लोकप्रियता मिळाली नाही तरी किमान स्वागतता मिळणे फार गरजेचे  ते झालं नाही कि प्रायोगिकता खुंटायला लागते

जे व्यावसायिक प्रोफेशनल आहे त्याला मान्यता मिळणे आवश्यक असते जेणेकरून अशा कलाकृतीत घातलेला पैसा वसूल होऊन त्यातून थोडाफार फायदा मिळेल

जे धंदेवाईक कमर्शियल आहे त्याला मात्र नुसती मान्यता मिळून चालत नाही तर प्रचंड लोकप्रियता मिळणे गरजेचे असते त्याशिवाय घातलेला पैसा जो कधी कधी प्रचंड असतो वसूल होत नाही साहजिकच मार्केट आणि ग्राहक ह्या दोन्ही गोष्टी इथे आवश्यक असतात

चित्रपट ह्याला अपवाद नसतात चित्रपटात पैश्याची गणितं फार मोठी होत जातात त्यामुळे प्रायोगिक चित्रपट हा जवळ जवळ अशक्य बनत जातो पैशे बरबाद करण्याची क्षमता असलेला निर्माता मिळाला तरच प्रायोगिक चित्रपट घडू शकतो न्यू वेव सिनेमानंतर चित्रपटात प्रायोगिक चित्रपटाची लाट कधी आल्याचे निदान मला तरी आठवत नाही . जे काही सध्या प्रायोगिक म्हणून येतंय ते प्रत्यक्षात बहुतांशी समांतर आहे समांतर कलाकृती हमखास स्वागतता कमावतात म्हणून नवीन लोक मोठ्या हुशारीने समांतर चित्रपट बनवतात कारण त्यांना समांतर चित्रपट हे मान्यतेकडे न्हेण्याची शिडी आहे हे नीट माहित असते ह्यातील अनेकांना प्रायोगिकतेशी काहीही देणेघेणे नसते व्यावसायिक होता येत नाही म्हणून प्रायोगिक अशीही काही जणांची स्ट्रॅटेजी असते आर्ट सिनेमाच्या नावाने हे खपूही शकते काही मात्र खूपच सिरीयस असतात जे प्रायोगिक झालेले आहे ते त्यांना फार महत्वाचे वाटत असते त्यांना त्या प्रायोगिकतेला पुढे न्ह्यायचे असते किंवा संपन्न करायचे असतात उदाहरणार्थ डॉल्स हाऊस ह्या प्रायोगिक नाटकाचे अनंत काणेकर लिखित घरकुल हे समांतर रूपांतर

अनेकदा समांतर रूप व्यावसायिक दृष्ट्या प्रस्तुत करता येईल असेही वाटू शकते मग व्यावसायिक पातळीवर आचार्य अत्रे डॉल हाऊसचे  व्यावसायिक रूपांतर करून ते घराबाहेर ह्या नावाने सादर करतात त्यासाठी काही आक्षेपार्ह बदल घडवतात आणि मूळ प्रायोगिकतेचा पाया विसविशीत करतात

चित्रपट कलेच्या संदर्भात एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे कुठला देश स्वतःची म्हणून कुठली मुख्य शैली निवडतो ?फ्रान्सच्या बाबत ही शैली प्रामुख्याने प्रायोगिक व समांतर असल्याचे दिसते तर यूएसए विशेषतः हॉलिवूड व्यावसायिक शैली प्रधान शैली म्हणून निवडतो भारत विशेषतः बॉलिवूड मात्र धंदेवाईक शैली स्वतःची मुख्य शैली  म्हणून निवडतांना दिसतो साहजिकच बुद्धिवंतांच्यामध्ये बॉलिवूडबद्दल एक आंतरिक असमाधान आढळते
१९९९ नंतर मात्र हळहळू व्यावसायिक शैली हीही प्रधान शैली म्हणून विकसित होतांना दिसते विशेषतः बायोपिक्स आणि बायोसिन्स ह्यांच्या आधारे आलेल्या भाग मिल्खा भाग मेरीकॉम  वा तलवार सारख्या चित्रपटांनी ही व्यावसायिक शैली हिट होण्याची गॅरंटी निर्माण केली ज्याचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर होऊन मराठीतही लोकमान्य बालगंधर्वसारखे व्यावसायिक बायोपिक निर्माण झाल्याचे दिसते

फिक्शनमध्ये दिल चाहता हैं लगान मुन्नाभाई एम बी बी एस सारख्या चित्रपटांनी व्यावसायिक शैलीही यशस्वी होऊ शकते हे पुन्हा एकदा लक्षात आणून दिले वास्तविक व्ही शांताराम हे ह्या शैलीचे मुख्य पायोनियर त्यांचे माणूस , दो आँखे बारह हाथ , डॉ कोटणिसकी अमर कहाणी ( हा भारतातील पहिला व्यावसायिक बायोपिक चित्रपट ) ह्यांनी हा पायंडा पाडला होता पुढे प्यासा , आवारा , जोगन , नया दौर ह्या सारख्या चित्रपटांनी तो पुढे न्हेला होता पण नंतर उत्कृष्ट संगीत आणि रोमान्स ह्यांच्या धंदेवाईक मिश्रणाने ह्या पायाला उद्धवस्त केले सलीम जावेदनी सोशल ऍनगरही धंदेवाईक करून दाखवला आणि त्यामुळे सोशल कमिटमेण्टही बाजारू गोष्ट बनली हळूहळू ह्या कढीला शिळेपणा प्राप्त झाला आणि त्यातूनच पुन्हा एकदा व्यावसायिकतेची वाट निर्माण झाली प्रश्न असा आहे कि ह्यापुढे हॉलीवूडसारखी आपलीही प्रधान शैली हीच व्यावसायिक शैली होणार कि दबंग सारखे धंदेवाईक चित्रपट धंदेवाइकतेचा नवा पायंडा पाडणार ?

माझ्या मते १९५७ नंतर हळूहळू व्यावसायिक हटत गेला तसे होणार नाही ह्यापुढे बॉलिवूड धंदेवाईक आणि व्यावसायिक असे दोन्ही प्रकारचे चित्रपट निर्माण करत राहील दिल चाहता हैं आणि मेरीकॉम  सारखे चित्रपटही येत राहतील आणि दबंग सारखेही !

ह्यात प्रश्न असा निर्माण होतो कि ह्यात प्रायोगिक आणि समांतरचे काय ? तर ह्यांचे कठीण दिवस पुढेही चालू राहतील हेच त्याचे प्रामाणिक उत्तर आहे .

श्रीधर तिळवे नाईक








Friday, October 21, 2016

निसर्गवाद , वास्तववाद , देशीवाद   आणि दृकप्रत्ययवाद ह्यांच्यावर पांच प्ले ऍनालिसिस वर तीन आणि ग्रीक शोकांतिकेवर दोन अशी दीड तासांची दहा व्याख्याने देतांना मजा आली . ह्यावेळीही प्रतिसाद जबराट होता . मागच्याप्रमाणे ह्याहीवेळी काही  दीड तासाची व्याख्याने दोन तासांवर गेली . शिवाय संगीताचे काम त्यामुळे गेले पांच दिवस वीस तास काम आणि चार तास झोप असा प्रकार चालू होता नवीन पिढीचा आय क्यू आमच्या पिढीपेक्षा अधिक उजवा आहे . त्यामुळे शंका अनेक !फ्रेंच विद्यार्थिनीला प्लेटो ,ऍरिस्टॉटल , देरिदा शिकवणे हाही एक अनुभव कारण शंका थेट युरोपिअन परंपरेतून आलेल्या !आता दोन दिवस विश्रांती घ्यावी म्हणतोय .



Sunday, September 25, 2016

संध्या सोमण  आणि सतीश तांबे ह्यांच्या पोस्टमुळे लिहावी लागलेली पोस्ट

सध्याच्या काळात स्पर्श प्राथमिक असण्याची गरजच संपलीये . तुमच्याकडे भाषा आहे आणि स्पर्शाआधी तुम्ही त्या स्त्रीला वा पुरुषाला  विचारू शकता मेसेज पाठवू शकता .  ती व्यक्ती नाही म्हंटली तर स्पर्श टाळणेच योग्य . सार्वजनिक ठिकाणी वा सभारंभात अनोळख्या व्यक्तीच्या  मिठीकडे जाण्यापेक्षा हॅन्डशेक योग्य . जिची ओळख आहे तिच्याबाबत  संध्याजीनी उपस्थित केलेला स्पर्शप्रश्न उपस्थित होणे थोडे अशक्य आहे . ओळख असूनही तिचा मूड तुम्हाला कळत नसेल तर ओळख '' ओळख '' न्हवे . आणि स्पर्शासाठी ओळख असेल तर प्रथम भाषाच वापरणे योग्य . 

Friday, February 12, 2016

UNIVERSITY OF MUMBAI

Was busy in delivering lectures in UNIVERSITY OF MUMBAI for MASTER OF THEATRE ARTS on
1 NET OF PLAY
2 THEORY OF ACTING
3 HOW TO INTERPRET PLAY
4 SIGMUND FREUD AND SYMBOLIC THEATRE
5 EXISTENTIALISM AND ABSURD THEATRE

Thursday, December 10, 2015

SHRIDHAR TILVE (WRITER-DIRECTOR)
Born in Kohlapur. Shridhar Shantaraam Tilve, is an M.A (first class first) in Literature, and Fellowship Holder for 5 years in Visual Arts.
During his 5 years of Visual Arts research, he gained an in-depth knowledge of Film making .
He had started his Directorial journey with the Direction of several successful local Commercial Ads, and Documentaries.
In 2008 he Wrote his first Feature Film in Marathi named 'JOSHI KI KAMBLE' which went on to be a commercial success and won many Awards.  Directing Hindi feature film.
 FILM AWARDS:-
- ZEE GAURAV AWARD - BEST STORY for 'JOSHI KI KAMBLE'
- MAHARASHTRA TIMES AWARDS - BEST STORY ,
                                                                SCREENPLAY, DIALOGUES
                                                             'JOSHI KI KAMBLE
OTHER HONORS:-
- The Prestigious KESHAVSUT AWARD as a Best young writer by Govt. of Maharashtra.
- SAHAKARMAHARSHI VANGMAY PURASKAAR as a young talent along with Vijay Tendulkar (celebrated writer).
Shri. Shridhar Tilve has also contributed immensely to Hindi and Marathi literature by writing several plays, poems and novels.
PLAYS:-
-eka mhataryacha khoon (acted )
- Ek tha Kach(writer)
-udahernarth mrutyu waigare(writer,director ,actor)
- Satiechya Savalya(writer)
- Arth, Vayarth ani Nirath(writer director and music director)

PUBLISHED WORK
NOVELS:-
- A DA HAW KA BA NA SU NA

- ATMACHARITABLE KALPNIK KSHAN
STORY COLLECTION:-
-AMERIKECHE ADHYAKSHA ALE TEVHACHI GOSHT
POETRY COLLECTIONS:-
KA VI
CHANNEL:DESTROYERY
STREEVAHINI
EKA BHARTIYA VIDYARTHACHE UDGAR
CHANNEL:UNDER THE WORLD
DECATHLON
DECATHLON:REAL
DECATHLON:SURREAL
DECATHLON:TRANSCEREAL
PHILOSOPHY AND AESTHETICS OF ART       
-TEEKAHARAN
-CHAUTHI  NAVTA
FILM SCRIPT
JOSHI KI KAMBLE